न्यूज पीसीएमसी नेटवर्क
शिरूर (दि. ०१ मे २०२५) :- शिरूर तालुक्यातील पाबळ येथे कामगार तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या तलाठ्याचा मृतदेह विहिरीत आढळला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पवन अशोक बांदल ( वय ३२) असे मृत झालेल्या तलाठ्याचे नाव आहे.
त्यांच्याच शेतातीत विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला आहे. त्यांच्या भावाने कामावर जाताना आपल्या शेतातील मोटार चालू करून जा, असे सांगितले होते. त्यानंतर काही वेळाने भाऊ तिथे गेल्याने सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील करडे गावात राहणारे पवन बांदल हे पाबळ या ठिकाणी कामगार तलाठी असून ते मंगळवारी कामावर जाण्यासाठी निघाले होते. त्यांचे भाऊ श्रीनिवास बांदल यांनी जाताना आपल्या शेतातील मोटार चालू करून जा असे सांगितले. मात्र, दुपार होत आली तरी शेतात पाणी न आल्याने श्रीनिवास हे शेतातील विहिरीवर गेले. कामावर जाताना पवन हे कामाच्या गडबडीत मोटार चालू करण्यास विसरला असावा असा समज त्यांचा झाला म्हणून ते विहिरीवर गेले. त्यावेळी विहिरीच्या जवळ त्यांना भावाची दुचाकी आढळून आली. त्यांनी विहरीत डोकावून पाहिले तर पवनचा मृतदेह पाण्यावर तारांगताना आढळून आला.
त्यानंतर श्रीनिवास यांनी आरडा ओरडा करून शेजारच्या नागरिकांना आणि पोलिसांना कळवले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढला. पवन याला पोहता येत नव्हते. कदाचित मोटार चालू करायला गेला असताना तोल जाऊन तो विहीरीत पडला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर शिरूर पोलिसांनी पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पवन हे गेल्या सात महिन्यांपासून कामगार तलाठी म्हणून कार्यरत झाले होते. त्याअगोदर त्यांनी अभियांत्रिकीचे देखील शिक्षण घेतले होते. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबंवर शोकाळाला पसरली आहे. अधिक तपास शिरूर पोलिसांकडून केला जातं आहे.











