न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई :- अभिनेते नाना पाटेकर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरून मला धमकावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तनुश्री दत्ताने आज मुंबईत एक पत्रकार परिषद घेऊन केला.
थेट मनसे आणि राज ठाकरेंवर हल्ला चढवत ती म्हणाली, “मनसेची भाषा कायम तोडफोडीची आहे. राज ठाकरे गुंड आहेत, त्यांनी आपल्यासारखेच गुंड पक्षात घेतले आहेत. राज ठाकरे त्यांना तोडफोड करण्यासाठी ठिकठिकाणी पाठवत असतात. लीडर न झाल्याची खदखद त्यांच्या मनात आहे. कुणीच तुम्हाला लीडर बनवणार नाही. कारण लोकांना सरकार राज नकोय. लीडर तो असतो, जो गरजू लोकांची, महिलांची सुरक्षा करतो. महिलांवर दबाव टाकत नाही आणि महिलांच्या गाडीवर हल्ला चढवत नाही, असं तनुश्रीनं पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
नेमका प्रकार काय?
२००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी नाना पाटेकर यांनी आपल्याशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप तनुश्री दत्ताने नव्याने केल्याने खळबळ उडली आहे.
नाना पाटेकर बॉलिवुडमधील अनेक महिला कलाकारांशी असभ्य वर्तन करतात, पण यावर कुणाची बोलायची हिंमत होत नाही, असंही तनुश्री म्हणाली. त्यानंतर नाना पाटेकर यांनी गुंडांकरवी मला आणि माझ्या कुटुंबीयांना धमकावल्याचंही तनुश्रीने सांगितलं आहे. तिने हेच आरोप काही वर्षांपूर्वीही केले होते, असं सांगण्यात येत आहे, मात्र तिच्या बोलण्याची दखल आता अधिक गांभीर्याने घेतली जात आहे.
यावर नानांची प्रतिक्रिया ?
तनुश्रीचे हे आरोप नानाने फेटाळून लावले असून याप्रकरणी तनुश्रीला कोर्टात खेचणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. चित्रीकरण सुरू असताना माझ्याबरोबरच सेटवर अनेक लोक होते. मी काहीही केलेलं नाही, हे त्यांनाही माहिती आहे.
“कुणी काय बोलावं यावर नियंत्रण कसं ठेवणार? तिच्या आरोपाबाबत कायदेशीर कारवाई करण्याचा विचार मी करत आहे?” असं नाना पाटेकर म्हणाले.