न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जून २०१९) :- संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहू येथून प्रस्थान २४ जून तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदी येथून २५ जून रोजी प्रस्थान होणार आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा पिंपरी-चिंचवड शहरातील मुक्काम २६ जून रोजी होणार आहे. यासाठी पालखी सोहळा नियोजनाची आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना निवेदन दिले आहे.
पालखी सोहळ्यादरम्यान इंद्रायणी नदीमध्ये पाणीसाठा ठेवण्यात यावा. त्यासाठी जादा पाणी सोडावे. पोलिसांकडून कडक सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी. वारक-यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करावी. टँकर उपलब्ध करावेत. तात्पुरते शौचालय, अग्निशमन बंब, आरोग्य सेवा, स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचा-यांची नेमणूक करावी. कचरा कुंड्या उपल्बध कराव्यात.
पालखीचे स्वागत करण्यासाठी उभारण्यात येणारे स्वागत कक्ष पालखी मार्गाच्या रस्त्यामध्ये किंवा अडथळा निर्माण होतील, असे उभारु नयेत. योग्य अंतरावर अथवा रस्त्याच्या बाजूस उभारावेत. त्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी आमदार लांडगे यांनी या निवेदनात केली आहे.











