- मतदारसंघात सत्ता अनं. पदे आल्यानंतर या प्रवृत्तींनी अक्षरशः चालविला नंगानाच
- एमआयडीसीतील उद्योजक अक्षरशः वैतागले; अनेकांनी आपले युनिट अन्यत्र हलविले
- निगडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपच्या सतीश कदम यांचा सत्ताधा-यांवर आरोप
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ९ ऑक्टोबर २०१९) :- भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना निगडी, सेक्टर क्रमांक २२ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपने पाठिंबा जाहीर केला आहे. भोसरी मतदारसंघ गुन्हेगारी, दहशत व भयमुक्त होण्याची गरज आहे. तसेच मतदारसंघातील प्रत्येक कामांत होणारा भ्रष्टाचार संपविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे मतदारसंघातील छोट्या-मोठ्या उद्योजकांकडून वसूल केल्या जाणाऱ्या खंडणीखोरीला कायमचा आळा बसावा आणि समाविष्ट गावांमधील उरल्यासुरल्या जमिनी वाचाव्यात यासाठी विलास लांडे यांना पाठिंबा दिल्याचे ग्रुपचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते सतीश कदम यांनी सांगितले. मतदारसंघातील सर्व मागासवर्गीय घटकांनी विलास लांडे यांना लाखांच्या मताधिक्याने निवडून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते सतीश कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “भोसरी विधानसभा मतदारसंघात औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा मतदारसंघ कष्टकरी आणि कामगारांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. मात्र मतदारसंघातील मतदारांनी पाच वर्षापूर्वी चुकीच्या प्रवृत्तींना संधी दिली. सत्ता आणि पदे आल्यानंतर या प्रवृत्तींनी संपूर्ण मतदारसंघात अक्षरशः नंगानाच चालविला आहे. मतदारसंघातील नागरिकांना सोशल मीडियावर खिळवून ठेवत या प्रवृत्तींनी प्रत्यक्षात आतून लुटीचा कारभार सुरू ठेवला आहे. मतदारसंघात प्रत्येक विकासकामांत यांचीच भागीदारी आणि वरून टक्केवारी असा कारभार सुरू आहे. प्रत्येक विकासकामांमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात एकही मोठा प्रकल्प उभा राहू शकलेला नाही. काही प्रकल्पांना मंजुरी दिली, पण भागीदारीचा हिस्सा लवकर ठरत नसल्याने मंजुरीनंतर भूमीपूजनाला एक-एक वर्षांचा कालावधी लागला आहे.
या मतदारसंघात कामे करणाऱ्या ठेकेदारांना धमकावून टक्केवारी वसूल केली जात आहे. मर्जीतील ठेकेदारांनाच कामे मिळतील, याची दक्षता घेतली जात आहे. बाहेरच्या ठेकेदाराने निविदा भरल्यास त्याला फोनवरून धमकावले जाते. त्यामुळे चांगले काम करणाऱ्या ठेकेदारांनी भोसरी मतदारसंघातून अक्षरशः पळ काढला आहे. चिखलीतील नियोजित संतपीठाच्या उभारणीतही भागीदारी आणि टक्केवारी घेऊन या चुकीच्या प्रवृत्तींनी किती खालची पातळी गाठली आहे, हे दाखवून दिले आहे. वारकऱ्यांचे श्रद्धास्थान ठरू पाहणाऱ्या या संतपीठातही पैसे खाऊन या प्रवृत्तींनी आपण कोणाचेच नसल्याचे सिद्ध केले आहे. पैसे खाल्ल्यानंतर तरी लाज वाटून संतपीठाच्या कामाला लवकर सुरूवात करण्याची गरज होती. मात्र त्यासाठी देखील निवडणूक जवळ येण्याची वाट पाहिली गेली. विधानसभा निवडणूक जवळ आल्यानंतर संतपीठाच्या भूमीपूजनाचा दिखावा करून नागरिकांना भावनिक करण्याचा प्रयत्न झाला. मतदारसंघातील समाविष्ट गावांत अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात हे रस्ते करण्याआधी समाविष्ट गावांतील शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने जमिनी विकत घेण्यात आल्या. त्यानंतर रस्ते करून आपल्याच जमिनींचा भाव वाढविण्यात आला आणि दुसरीकडे नागरिकांना रस्ते केल्याचे सांगून फसविण्याचा उद्योग केला गेला आहे.
विकासकामांमध्ये मिळणारा पैसा कमी पडतोय की काय म्हणून मतदारसंघातील औद्योगिक क्षेत्रात दहशत माजवून खंडण्या गोळा केल्या जात आहेत. त्यामुळे अनेक उद्योजक अक्षरशः वैतागले आहेत. अनेकांनी आपले युनिट अन्यत्र हलविले आहेत. मतदारसंघातील कंपन्यांमधील भंगार चोरीला प्रोत्साहन दिले जात आहे. हे सर्व राजकीय आशिर्वादाने खुलेआमपणे सुरू आहे. हे असेच सुरू राहिल्यास भोसरी मतदारसंघातील औद्योगिक क्षेत्र पुढील पाच वर्षांत नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. मतदारसंघात गोरगरीबांच्या विकासासाठी काहीच केले जात नाही. चिखली येथे दहा-अकरा वर्षापूर्वी सुरू असलेला स्वस्त घरकुल प्रकल्प आजही पूर्ण होताना दिसत नाही. गरीबांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करणारा हा प्रकल्प म्हणून त्याकडे मागील पाच वर्षे जाणूनबूजून दुर्लक्ष केले गेले आहे. आता प्रधानमंत्री आवास योजनेचे गाजर दाखवून गोरगरीबांना घरांसाठी पुन्हा फसविण्याचा उद्योग सुरू आहे. शेकडो कोटींच्या या प्रकल्पातही सत्तेत असलेल्या चुकीच्या प्रवृत्तींची भागिदारी असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे.
मतदारसंघात जागोजागी टपऱ्यांचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. हफ्ते घेऊन या टपऱ्या उभारण्यात आल्या आहेत. तसेच या टपऱ्यांच्या माध्यमातून काही तरूणांना हफ्ता चालू करून त्यांना वाम मार्गाला लावण्यात आले आहे. त्यामुळे मतदारसंघातील तरूण भरकटला गेला आहे. त्यातून अनेक तरूणांचे भवितव्य उद्ध्वस्त होऊ पाहत आहे. बेरोजगारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. खून, मारामाऱ्या, दरोडे, सोनसाखळी चोरी अशा गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महिला सुद्धा सुरक्षित नसल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. अवघ्या चार-पाच वर्षांच्या मुलींवर देखील बलात्कार होऊ लागले आहेत. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघ दहशतीत वावरत असल्यासारखी परिस्थिती आहे. ती बदलण्यासाठी माजी आमदार विलास लांडे यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. विलास लांडे हे दहा वर्षे भोसरी मतदारसंघाचे आमदार होते. त्यांच्या या दहा वर्षांच्या कार्यकाळात भोसरी मतदारसंघ कधीच दहशत, गुंडगिरी, भंगारचोरी, कंपन्यांच्या मालकांकडून खंडणीखोरी, हफ्तेखोरीच्या दहशतीत वावरलेला नाही. त्यामुळे हा मतदारसंघ पुन्हा भयमुक्त करण्यासाठी विलास लांडे हेच आमदार होण्याची गरज आहे. त्यांनी आमदार असताना मतदारसंघात जी विकासकामे केली, त्यातील २ टक्के विकासकामे सुद्धा गेल्या पाच वर्षात झालेली नाहीत. मतदारसंघाचा विकास होण्यासाठी आणि भयमुक्त व दहशतमुक्त वातावरण होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपने विधानसभा निवडणुकीत विलास लांडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. भोसरी मतदारसंघातील मागासवर्गीय मतदारांनीही आपल्या पुढील पिढीच्या भविष्याचा विचार करून विलास लांडे यांनाच भरघोस मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन सतीश कदम यांनी केले आहे.”















