न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ नोव्हेंबर २०१९) :- विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपा-शिवसेना युतीला सत्ता स्थापनेसाठी स्पष्ट कौल मिळालेला असतानाही राज्यात सत्तेचा रथ मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटपावरून रूतून बसला आहे. दरम्यान, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी सत्तास्थापनेबाबत मोठं विधान केलं आहे. “शिवसेनेकडं १७५ आमदारांचं संख्याबळ असून, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत आले आहेत. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. शिवतिर्थावर शपथविधी होईल,” असा दावा राऊत यांनी केला आहे.
शिवसेनेच्या मुख्यमंत्री पदाच्या आग्रहामुळं राज्यातील सत्ता स्थापनेचा गाडा अडकला आहे. शिवसेना मागणीवर ठाम असताना भाजपाकडून मात्र, मुख्यमंत्रीपदासह समसमान वाटपावर कोणतीही तडजोडीची भूमिका घेताना दिसत नाही. त्यात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन खळबळ उडवून देणारी माहिती दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, “शिवसेनेला पाठिंबा देणारी संख्या वाढली आहे. कालपर्यंत १७० होती, ती आज १७५ पर्यंत आली आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शिवसेना मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा आहे आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल. तसेच शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवतिर्थावर शपथ घेईल. उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत पोहोचले असून, लवकरच गणित माध्यमांसमोर मांडण्यात येईल,” असा दावा त्यांनी केला आहे.