न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २२०१९) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवार दि.२५/११/२०१९ पासून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहीर केला असुन सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व महापालिका प्रशासन यांच्या अकार्यक्षम गलथान व भ्रष्ट कारभार मुळेच असा निर्णय घ्यावा लागला आहे. याचा शारीरिक, मानसिक, आणि आर्थिक त्रास शहरातील करदात्या नागरिकांना बसणार आहे. विशेषता महिलांना या निर्णयाचा खूप त्रास सहन करावा लागणार आहे.
यावर्षी पावसाळा चांगला झालेला असून परतीचा पाऊस देखील मोठा झालेला आहे. पवना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असताना केवळ नियोजनाचा अभाव व ढिसाळ अकार्यक्षम, भ्रष्ट कारभारामुळे पाणीपुरवठा विभागाचा खेळखंडोबा झाला असून त्यामुळेच हा दुरदैवी निर्णय घ्यावा लागला आहे. महापालिकेतील विविध प्रकल्पाच्या निविदा, ठेके, त्यातील रिंग सल्लागारांच्या नियुक्तया, थेट पद्धतीने कामे त्यातून टक्केवारीचे भ्रष्ट राजकारण यामध्ये सत्ताधारी भाजपा व प्रशासन मुशगुल असून त्यांना पाणी, आरोग्य, स्वच्छता या मूलभूत प्रश्नांवर काम करण्यासाठी वेळच नाही.
सत्ताधारी व प्रशासन केवळ पैसा कमवणे याच कुउद्देशाने काम करत असुन या शहरातील नागरिकांच्या जीविताशी खेळत आहेत. त्यामुळे अशा अकार्यक्षम संवेदनाहीन सत्ताधारी भाजपा व प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. हा निर्णय जनतेच्या विरोधात असून हा निर्णय त्वरित मागे घेण्याचे आदेश व्हावेत व आयुक्तांची त्वरित बदली करावी, असे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.