- माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० मे. २०२०) :- पिंपरीतील महात्मा फुलेनगरमध्ये महापालिकेने पंचवीस संशयित नागरिकांना क्वारंटाइन केले आहे. परंतु, १४ दिवस घरी राहणे बंधनकारक असतांना, हे नागरिक अत्यंत बेपर्वाहीने समाजामध्ये वावरतांना दिसून येत आहेत. क्वारंटाइनमधील नागरिकांना वारंवार सांगूनही ते कोणतेही सामाजिक अंतर न ठेवता बिन्दास्तपणे फिरतांना दिसतात. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने महात्मा फुलेनगर व लांडेवाडीमधील क्वारंटाइनमधील नागरिकांना एमआयडीसीच्या महाराष्ट्र राज्य परिवहन प्रशिक्षण केंद्रामध्ये राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेना युवासेना पुणे जिल्हा समन्वयक तथा माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात ननावरे यांनी म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक २० मध्ये महात्मा फुलेनगर व लांडेवाडी झोपडपट्टी वसाहत आहे. हा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा असून या ठिकाणी किमान दोन हजार घरे व अंदाजे पंधरा हजार लोकसंख्या आहे. सध्या कोविड-१९ या आजाराच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कोरोना या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी सर्व तो परी प्रयत्न सुरु आहे. परंतु दाट लोकवस्ती मध्ये कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून त्या परिसरामध्ये योग्य उपाय योजना करणे अत्यंत गरजेचे वाटते.
शहरातील मोठ्या दाट लोकवस्ती पैकी महात्मा फुलेनगर झोपडपट्टी आहे. या ठिकाणी एक रुग्ण पॉजिटिव्ह रुग्ण सापडला. परंतु, पुढील संभाव्य धोका लक्षात घेता परिसरामधील क्वारंटाइन नागरिकांना एमआयडीसीच्या महाराष्ट्र राज्य परिवहन प्रशिक्षण केंद्रामध्ये राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास येथील नागरिकांना संसर्ग होण्याचा धोका कमी होईल.
महात्मा फुलेनगर झोपडपट्टी व लांडेवाडी मध्ये ५० % कुटुंबातील सदस्य सार्वजनिक शौचालयचा वापर करतात. या ठिकाणी अत्यंत छोटे – छोटे गल्ल्या आहेत. मोठ्या प्रमाणात दाट लोकवस्ती असल्यामुळे नागरिकांचा सहज संपर्क होवून कोरोना आजाराचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. सध्या महात्मा फुलेनगरमध्ये पंचवीस संशयित नागरिकांना क्वारंटाइन केले आहे. परंतु १४ दिवस घरी राहणे बंधनकारक असतांना हे नागरिक अत्यंत बेपार्वाहीने समाजामध्ये वावरतांना दिसून येत आहेत. क्वारंटाइन नागरिकांना वारंवार सांगूनही कोणतेही सामाजिक अंतर न ठेवता बिन्दास्तपणे फिरतांना दिसतात. त्यामुळे येथील परिस्थितीचा योग्य आढावा घेवून महाराष्ट्र राज्य परिवहन प्रशिक्षण केंद्रामध्ये क्वारंटाइन नागरिकांना जागा उपलब्ध करून दिल्यास आनंदनगर झोपडपट्टीसारखी परिस्थिती उद्भवणार नाही.
आयुक्तांनी ही परिस्थिती अत्यंत गांभीर्याने लक्षात घेवून लवकरात लवकर महात्मा फुलेनगर व लांडेवाडीमधील क्वारंटाइन नागरिकांना एमआयडीसीच्या महाराष्ट्र राज्य परिवहन प्रशिक्षण केंद्रामध्ये राहण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, असे या निवेदनात जितेंद्र ननावरे यांनी म्हटले आहे.