- चिखली, पाटीलनगर येथील जलशुध्दीकरण प्रकल्पाची महापौरांकडून पाहणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२. जून. २०२०) :- पिंपरी चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन आंद्रा व भामा आसखेड धरणातून शहरात पाणी आणणेबाबत महानगरपालिकेने नियोजन केलेले आहे. त्या अनुषंगाने चिखली येथे जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिखली,पाटीलनगर येथे उभारण्यात येत असलेल्या ३०० एम.एल.डी.क्षमतेच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाची आज महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
यावेळी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांचे समवेत सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांचेसह संबधित विभागाचे सह शहर अभियंता रामदास तांबे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, डी.आर.ए.कन्संल्टन्सी संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चिखली येथे २० एकर जागेमध्ये ३०० एमएलडी क्षमतेचा जलशुध्दीकरण प्रकल्प उभारण्यात येत आहे. हा प्रकल्प २४ महिने कालावधीचा असुन या प्रकल्पाची महापौर व पदाधिकाऱ्यांनी माहिती घेतली. तसेच दर महिन्याला या कामासंदर्भातील माहिती पदाधिकाऱ्यांना द्यावी तसेच कामाच्या प्रगतीचा आढावा मांडावा. या संदर्भात महापौर माई ढोरे यांनी अधिकाऱ्यांना सुचना केल्या. यावेळी प्रकल्पाच्या १४०० mm व्यासाची पाईपलाईनच्या कामाची देखील पाहणी करण्यात आली. WTP, पाईप लाईन आणि बंधाऱ्यातुन पाण्याचा उपसा या गोष्टी समांतर सुरु रहाण्याकरीता कामाचा वेग व नियोजन महत्वाचे आहे. तरच मुदतीत काम पुर्ण झाल्यास शहराला आज सुरु असलेला दिवसाआड पाणीपुरवठा बंद होवुन पुढील वर्षी शहरवासीयांना पुरेसे पाणी उपलब्ध होईल, या संदर्भात सुचना महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केल्या.