न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३०. जुलै. २०२०) :- दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारप्रमाणे रेमडेसवीर, टोसिलिझुमाब ही औषधे राज्यातील शासकीय रुग्णालयात वैद्यकीय गरजेनुसार गंभीर स्थितीतील कोविड रुग्णांना मोफत द्या आणि या औषधांचा होणारा काळाबाजार तत्काळ थांबवावा, तसेच शास्त्रीय आधारानुसार या औषधांचा काळजीपूर्वक वापर होण्यासाठी पावले उचलावीत या मागण्यांसाठी आम आदमी पक्ष महाराष्ट्र राज्य समितीतर्फे ऑनलाईन पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला श्री किशोर मान्ध्यान (सहसंयोजक-आप महाराष्ट्र), श्री धनंजय शिंदे (सचिव-आप महाराष्ट्र), डॉ अल्तमश फैझी (आप महाराष्ट्र राज्य समिती सदस्य), डॉ अभिजित मोरे (प्रवक्ता, आप महाराष्ट्र) यांनी संबोधित केले.
“कोविड-१९ आजारामुळे गंभीर स्थितीमध्ये असलेल्या रुग्णांसाठी रेमडेसवीर व टोसिलिझुमाब ही दोन औषधे महत्त्वाची आहेत. दिनांक १३ जून २०२० च्या आयसीएमआरच्या कोविड-१९ उपचारासाठीच्या सुधारित मार्गदर्शिकेनुसार रेमडेसवीर हे औषध इमर्जन्सी परिस्थितीत ऑक्सिजनवर असलेल्या कोविड रुग्णाला दिले जाऊ शकते तर टोसिलिझुमाब हे औषध व्हेटींलेटरवर असणाऱ्या व स्टेरॉइडला प्रतिसाद न देणाऱ्या गंभीर कोविड रुग्णाला दिले जाऊ शकते. ही औषधे केवळ वैद्यकीय सल्ल्यानुसार व देखरेखीखाली घ्यायची आहेत. ही औषधे म्हणजे Investigational Therapy असून त्याच्या परिणामांबाबत शास्त्रीय अभ्यास अजूनही सुरु आहेत. सध्या ही औषधे बाजारात उपलब्ध असून आवश्यकतेनुसार सरकारी व खाजगी रुग्णालयातील डॉक्टर ही औषधे घेण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे ती मिळवण्यासाठी लोक धडपड करत आहेत”, असे डॉ अल्तमश फैझी यांनी सांगितले.
“आम आदमी पक्षाला असे आढळले आहे की रेमडेसवीर व टोसिलिझुमाब या दोन्ही औषधांचा तुटवडा मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. त्याचा काळाबाजार सुद्धा केला जात आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये ही औषधे मोफत मिळत नसल्याने गंभीर स्थितीतील रुग्णांना ही औषधे बाहेरुन चढ्या किंमतीत विकत घेण्यास भाग पडत आहे. या औषधांच्या किमती या हजारोंमध्ये असल्यामुळे, त्याचे मल्टिपल डोसेज घ्यावे लागत असल्यामुळे त्याचा खर्च २५ हजार ते ७० हजार इतका आहे. काळाबाजारामुळे हा खर्च ५० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत जातो आणि एवढा मोठा खर्च सर्वसामान्य कुटुंबांना परवडू शकत नाही. केवळ आर्थिक परिस्थिती नाही म्हणून अशा लोकांना ही औषध विकत घेता येत नाहीत. लॉकडाऊन, कोविडची साथ यांमुळे गेल्या चार महिन्यापासून राज्यभरातील अर्थव्यवस्था ही बर्यापैकी ठप्प झाल्यामुळे एकंदरीतच राज्यातल्या बहुतांश लोकांची आर्थिक अवस्था ही दयनीय झालेली आहे. त्यामुळे त्यांना रेमडेसवीर व टोसिलिझुमाब विकत घेऊन आपल्या कुटुंबियांचा उपचार करणे अशक्य झाले आहे”, असे धनंजय शिंदे यांनी सांगितले.
“महाराष्ट्र राज्यामध्ये कोविड-१९ आजाराने संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस अतिशय वेगाने वाढत आहे. राज्य सरकारच्या रुग्णालयामध्ये मोठ्या संख्येने कोविड्चे गंभीर रुग्ण भरती केलेले आहेत. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. अशा रुग्णालयांमध्ये येणारा जनता ही परिस्थितीने नडलेली, पिचलेली असते. दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्षाच्या सरकारने ही दोन्ही औषधे सरकारी रुग्णालयात उपलब्ध केली आहेत आणि वैद्यकीय गरजेनुसार आवश्यक ते औषध गंभीर स्थितीतील कोविड रुग्णाला डॉक्टरी सल्ल्यानुसार मोफत दिले जात आहे. त्यासाठी कोणतेही पैसे घेतले जात नाहीत. दिल्ली सरकारची ही कृती अतिशय महत्वाची आहे”, असे किशोर मान्ध्यान यांनी सांगितले.
“आम आदमी पक्षाने आज माननीय मुख्यमंत्री, अर्थमंत्री, आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे की महाराष्ट्र सरकारने दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारप्रमाणे रेमडेसवीर, टोसिलिझुमाब ही दोन महत्वाची औषधे राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात उपलब्ध करुन वैद्यकीय गरजेनुसार गंभीर स्थितीतील कोविड रुग्णांना ही औषधे मोफत द्यावीत. तसेच या औषधांचा होणारा काळाबाजार तत्काळ थांबवावा.तसेच या औषधांचा अतिवापर होऊन रुग्णांना त्रास होऊ नये यासाठी याबाबतची उपचार नियमावलीची अंमलबजावणी व्हावी”, अशी मागणी डॉ अभिजित मोरे यांनी केली.