न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९. ऑगस्ट. २०२०) :- कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणाऱ्या ग्रामीण सामाजिक संस्था संघटनांच्या कर्मचाऱ्यांना २५ लाख रुपयांचे विमा कवच देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
शासनाने कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण दिले आहे. कोरोनामुळे मृत्यू झाला तर कुटुंबीयांना अंत्यदर्शन होऊ शकत नाही, अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहता येत नाही. अशा वेळी शासकीय सेवेत नसलेल्या काही सामाजिक संस्था, संघटनांचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून हा विधी करत आहेत.
या कर्मचाऱ्यांनाही कोरोना संसर्गाचा धोका असल्याने त्यांचे आर्थिक संरक्षण करण्याच्या दृष्टीने त्यांना ३० सप्टेंबरपर्यंत विमा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला. गंभीर व परिस्थिती पाहून ३० सप्टेंबरनंतरही विमा कवच मुदत वाढविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही मुश्रीफ म्हणाले. संबंधित सामाजिक संस्था, संघटना यांच्या कर्मचाऱ्यांची नोंद ग्रामपंचायतींमध्ये असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कर्मचारी त्याच्या इस्पितळात दाखल होण्याच्या अथवा मृत्यूच्या दिनांकापूर्वी १४ दिवसांच्या काळात कर्तव्यावर हजर असल पाहिजे, अशा काही अटींच्या अधीन राहून हे विमा संरक्षण देण्यात येत आहे.