न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२. सप्टेंबर. २०२०) :- केंद्र सरकारने ११८ अॅप्सवर बंदी घातली आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ही बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये तरुणांमध्ये प्रचंड वेड असणाऱ्या पबजी गेमचाही समावेश आहे. भारताच्या सायबर स्पेसची सुरक्षा आणि सार्वभौमत्व राखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं मंत्रालयाने निर्णय जाहीर करताना सांगितलं आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९ अ अंतर्गत पबजी मोबाइल गेमवर बंदी आणण्यात आली आहे. भारताचं सार्वभौमत्व, सुरक्षेशी संबंधित गोष्टींमध्ये सहभागी असल्याने ही कारवाई कऱण्यात आल्याचं मंत्रालयाने सांगितलं आहे. मंत्रालयाने आपल्याकडे अनेक तक्रारी आल्या असल्याचंही म्हटलं आहे.
आम्हाला वेगवेगळे रिपोर्ट तसंच तक्रारी प्राप्त झाल्या होत्या ज्यामध्ये अॅड्रॉइड तसंच आयओएसवर उपलब्ध असणारे काही मोबाइल अॅप गैरवापर करत असून बेकायदेशीरपणे युजर्सचा डेटा चोरत असल्याचं सांगण्यात आलं होतं.














