न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२०) :- कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने मार्गदर्शक मार्गदर्शक तत्त्वांसह प्रार्थनास्थळे सुरु करणे हा व्यवहार्य तोडगा नाही, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयाला मंगळवारी सांगितले. मार्गदर्शकतत्त्वे आखून प्रार्थनास्थळे खुली करावीत, अशी मागणी करणारी जनहित याचिका एका एनजीओने उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
या याचिकेवरील सुनावणी न्या. ए. ए. सय्यद, न्या. एस. पी. तावडे यांच्या खंडपीठापुढे होती. भाविकांच्या संख्येवर व अन्य निर्बध घालून प्रार्थना स्थळे खुली करावीत, अशी विनंती याचिकादारांचे वकील दीपेश सिरोया यांनी खंडपीठाला केली. राज्य सरकारने या सूचनेवर विचार केला. मात्र, कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रार्थनास्थळे सुरू करणे व्यवहार्य नाही, असे महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले.
यासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सचिव किशोर निंबाळकर यांनी उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले. भाजी मंडई आणि गणेशोत्सवा दरम्यानचा अनुभव पाहता लोकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. एखाद्याचा धर्माचे आचरण करणे व त्याचा प्रसार करण्याचा घटनात्मक अधिकार सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आरोग्याच्या अधीन आहे. सार्वजनिक आरोग्याची देखभाल आणि सुधारणा करण्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे, असे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सरकारने मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली तरी नागरिक त्यांचे पालन करतील, याची खात्री नाही. नुकताच पार पडलेल्या गणेशोत्सवामुळे प्रशासनाचे चांगलेच डोळे उघडले आहेत. राज्य सरकारने गणेशोत्सव साजरा करण्यासाबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे आखली आणि नागरिक त्याचे पालन करतील अशी आशा बाळगली. महामारीच्या काळात सरकारला सहाय्य करणे हे नागरिकांचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे.