- राष्ट्रवादी प्रवेशानंतर एकनाथ खडसे यांचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑक्टोबर २०२०) :- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या निर्णयावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली असून पुन्हा एकदा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. आपण कोणवारही नाही फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याचं ते म्हणाले आहेत. जयंत पाटील यांनी पक्षप्रवेशाची घोषणा केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, कोणीही माझ्या राजीनाम्याची, चौकशीची मागणी केली नसताना राजीनामा घेतला गेला. सभागृहात कोणी अशी मागणी केल्याचं सिद्ध केलं तर मी राजकारण सोडण्यास तयार आहे. मीदेखील पक्षासाठी उभं आयुष्य घालवलं. दगड, धोंडे खाल्ले, लोकांनी मारलं, थुंकलं, वाळीत टाकलं अशा कालखंडातही आम्ही काम केलं. पक्षाने कमी दिलं असं नाही. पण मीदेखील पक्षासाठी ४० वर्ष काम केलं. आजही माझी कोणाविरोधातही तक्रार नाही. माझी तक्रार वारंवार बोलून दाखवली आहे”
देवेंद्र यांनी ज्याप्रक्रारे विनयभंगाचा खटला दाखल केला, भूखंड प्रकरणी चौकशी लावली. त्या सर्वांमधून मी सुटलो, पण मनस्ताप किती झाला. विनयभंगाचा खटला दाखल कऱणं, कोर्टात ते चालणं यापेक्षा मरण परवडलं. मी जेव्हा खटला दाखल कऱण्यासंबंधी देवेंद्रजींना विचारलं तेव्हा ते म्हणाले ती महिला फार गोंधळ घालत होती, टीव्हीवर दाखवलं जात होतं म्हणून नाईलाजाने सांगितलं. नियमानुसार काम करा असं सांगता आलं असतं. मला बदनामी सहन करावी लागली. इतक्या खालच्या स्तरावरुन जाऊन राजकारण झालं”.
तरीही त्यानंतर मी चार वर्ष काढली. नऊ महिने माझ्यावर आणि कथित पीएवर पाळत ठेवल्याचं मान्य केलं होतं. काय मिळालं काय नाही याचं दुख नाही. पण मनस्ताप खूप झाला याचं दु:ख आहे. आयुष्यात अनेक पदं मी ताकदीने मिळवली आहेत. म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागला. मी निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला आहे. जनतेची ताकद माझ्या पाठीशी आहे. महाराष्ट्रातील जनतेने मला मोठा प्रतिसाद दिला आहे आणि आजही देत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना किंवा काँग्रेसने कधीही माझ्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती, तुम्ही एक प्रसंग दाखवून द्या. मी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज आहे. एकाप्रकारे विनयभंगाचा खटला दाखल करणं तोही बनावट यापेक्षा वाईट काय. त्यांच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी फोन करणं त्यापेक्षा वाईट. भ्रष्टाचाराचा आरोप वैगेरे ठीक आहे, पण विनयभंगाचा आरोप किती वाईट, मी सुटलो त्यातून नाहीतर तीन महिने जेलमध्ये गेलो असतो. बदनामी घेऊन गेलो असतो. फक्त फडणवीसांमुळेच आपण पक्ष सोडत आहोत. मी आधीही विचारलं होतं आणि आजही माझा काय गुन्हा काय आहे ते पक्षाने स्पष्ट करावं, मी लाचार नाही, कोणाचीही भीती बाळगणारा नाही, कोणाचे पाय चाटत बसणाऱ्यातला तर अजिबात नाही. आपल्यासोबत एकही आमदार आणि खासदार राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये येणार नाही. रक्षाताईंनी काय निर्णय घ्यावा हे त्यांनी ठरवावं. पण त्यांनी मला भाजपा सोडणार नसल्याचं सांगितलं आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्याकडे आहेत. भाजपा सोडण्याच्या वेदना आहेत, पण इतक्या खालचं राजकारण करणाऱ्यासोबत काम करणं कठीण आहे. उद्या बलात्काराचा आरोप करतील. राष्ट्रवादीकडून आपल्याला कोणतंही आश्वासन मिळालेलं नाही, असे ते म्हणाले.