- निरंकुश सत्ताधारी भाजपची भक्ती-शक्ती उड्डाणपूल उद्घाटनाची नौटंकी..
- शिवसेनेच्या संतोष सौंदणकरांचा शहर भाजपवर घणाघात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०२०) :- सत्ताधारी भाजपने निगडीतील भक्ती शक्ती चौकात नव्याने बांधलेल्या पुणे-मुंबई व मुंबई-पुण्याकडे जाणा-या महामार्गावरील उड्डाणपुलाच्या मार्गीकेचे नुकतेच उद्घाटन केले. मुळात दोन्ही मार्गिका दोन महिने आधीपासूनच तयार असताना, केवळ नागरिकांना वेठीस धरून, पुलाचे राजकारण करण्याची स्टंटबाजी भाजपने केली आहे. शिवसेनेने पत्रव्यवहार केल्यानंतर सत्ताधाऱ्यांना उड्डाणपूल नागरिकांसाठी खुला करण्याची उपरती झाली? पुलाच्या अपयशाचे खापर आपल्याच माथी फुटत असल्याचे पाहूनच, सत्ताधाऱ्यांनी उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्याची नौटंकी केली का? असा घणाघात शिवसेनेचे चिंचवड विधानसभा संघटक संतोष सौंदणकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाजपवर केला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरातील वैशिष्टय़पूर्ण उड्डाणपुल निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकात साकारत आहे. या उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर व वर्तुळाकार मार्गाचे काम गेल्या अडीच वर्षांपासून सुरू आहे. सत्ताधाऱ्यांना नागरिकांच्या हिताचा एकही निर्णय तडीस लावता आला नाही. आधीच झालेल्या कामाच्या विलंबामुळे वाहनचालकांना सुमारे अडीच किलोमीटर अंतराचा वळसा मारून ये-जा करावी लागत होती. अखेरीस निरंकुश सत्ताधारी व झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी शहर शिवसेनेने पुढाकार घेतला व सर्वप्रथम पालिका प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. वस्तुस्थितीची जाणीव करून दिली. त्यानंतर बाकीचे जागे झाले.
प्रकल्पातील निगडी ते देहूरोड मार्गावरील सुमारे १ किलोमीटर अंतराच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने तेथून वाहतूक सुरू करावी. वाहनचालक व नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शहर शिवसेनेने पालिका प्रशासनाकडे केली . अखेरीस सत्ताधारी व प्रशासनाला जाग आली व उड्डाणपुलाचे भूमिपूजन उरकले. सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळेच उड्डाणपुल खुला होण्यास दोन महिन्यांचा विलंब झाला. पुलाच्या कामाचे श्रेय लाटणाऱ्या सत्ताधारी भाजपचे हेच खरे अपयश आहे. उद्घाटनाची नौटंकी करणाऱ्या सत्ताधारी भाजपचा खरा पारदर्शक चेहरा जनतेपुढे उघड झाला आहे. गेली चार वर्षे शहरात आपण काय दिवे लावले? याचे खरे आत्मचिंतन करण्याची वेळ भाजपवर आली आहे. उद्या जनतेला हिशोब द्यावाच लागणार आहे, असा घणाघात या पत्रकाद्वारे सौंदणकर यांनी भाजपवर केला आहे.