- देहुकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना समजावलं पाहिजे होतं..
- अनुत्तरीत प्रश्नांनी बंडातात्या कराडकरांचा भजन सत्याग्रह स्थगित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२१) :- देहूमध्ये तुकाराम बीज सोहळा साजरा करता यावा यासाठी वारकरी संप्रदायाचे बंडतात्या कराडकर यांनी आज दुपारी देहू गावच्या वेशीवर सुरू केलेला भजन सत्याग्रह अखेर थांबवला आहे. त्यांनी स्वतःयाबाबत घोषणा करून माहिती दिली.
यावेळी बंडातात्या कराडकर म्हणाले, “मी पहिल्यांदा सर्व सत्याग्रहींची क्षमा मागणार आहे. क्षमा एवढ्यासाठी मागणार आहे की, हे आंदोलन मी कोणालाही न सांगता जाहीर केलं, त्याचबरोबर हे देखील सांगेन की विचारत बसलो असतो तर हे आंदोलन झालं नसतं. मी विनंती केल्याप्रमाणे आपण सर्वजण आलात त्याबद्दल धन्यवाद. आताच जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला अभिवचन दिलं की, जे आपलं म्हणणं आहे ते शासनापर्यंत पोहचलवलं जाणार आहे.”
तसेच, “मी जिल्हाधिकाऱ्यांना जरूर सांगेन आमच्या हातातला कागद मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या टेबलवर गेला, म्हणजे आमचं म्हणणं त्यांच्यापर्यंत गेलं असं होत नाही. दिवसभर उन्हात असलेली माणंस, त्यांची तळमळ पाहा. खरं म्हणजे मी म्हणाले होतो, की आम्हाला जोपर्यंत तुम्ही आत सोडणार नाही तोपर्यंत आम्ही इथंच बसून राहू. रात्रं इथंच काढू उद्या सूर्योदयाला इथूनच पुष्पवृष्टी करू मग आम्ही घरी जाऊ, परंतु माधवीताईंनी माझी समजूत घातली असं करू नका, शासनालाही वेठीला धरू नका व आपल्या भाविकालाही वेठीला धरू नका, असं त्या म्हणाल्या. त्यामुळे सर्वांच्या मतांचा विचार करून मी हा आपला सत्याग्रह थांबणार आहे असं जाहीर करतो.” असं बंडातात्या कराडकर म्हणाले.
याशिवाय “वर्षभर महाराष्ट्रातील सगळी मंदिरं बंद असताना, नांदेडला जे गुरूद्वारा आहे ते वर्षभर कधीही बंद पडलं नाही. वर्षभर तिथं रोज १० हजार लोकांचं अन्नदान कधीही बंद पडलं नाही, कारण एकच आहे त्या लोकांची एकजुट. आपली एकजुट नाही ही आपली अडचण आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ५० माणसांसह तुकारामबीज होईल, असं जेव्हा जाहीर केलं तेव्हा आश्चर्य वाटलं होतं, कारण ५० माणसांनी काय होतं?. देहुकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना समजावलं पाहिजे होतं, आमचे काही सेवाधारी, मानकरी आहेत ते एवढ्या अंकांत बसू शकत नाहीत. वारकरी दिसले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली पाहिजे होती.” असंही बंडातात्या कराडकर यांनी बोलून दाखवलं
“वारकरी हा मानवता धर्म जपणारा आहे. पोलीस खात्यावर ताण पडेल असं कोणत्याही प्रकारचं वर्तन वारकरी करणार नाही, हे आम्ही अगोदरच सांगितलं होतं. परंतु, वर्षभरापासून आम्ही जे सहन करत आहोत हे किती दिवस चालणार आहे? मी पोलीस विभागाचे आभार मानतो तुम्ही संयमाने आम्हाला मदत केली. तुम्ही वारीवर बंधनं घाला वारी बंद होत नाही, आम्ही बंधन नक्की पाळू परंतू बंद नाही पाळणार. वारकऱ्यांच्या मागण्यांचा सहानभुतीपूर्वक विचार करू, असं सरकारने आम्हाला सांगाव.” असं बंडातात्या कराडकर यावेळी म्हणाले.