- आजपासून पाल्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरता येणार..
- यापूर्वी अर्ज भरलेल्या पालकांनाही अर्ज नव्याने भरावा लागणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ मे २०२४) :- राज्य शासनाने आरटीईमध्ये सुधारणांच्या नावे केलेल्या नियम बदलास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या आठवडाभरानंतर आरटीई प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त लागला आहे. या प्रवेश प्रक्रियेला नव्याने सुरुवात होणार असून, पालकांना शुक्रवारपासून (दि. १७) पाल्यांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहेत. मात्र, यापूर्वी अर्ज भरलेल्या पालकांना आपल्या पाल्याचा अर्ज नव्याने भरावा लागणार आहे.
आरटीई प्रवेशासाठी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील १ लाखांवर जागा उपलब्ध करून दिल्या आहेत. आरटीईतील अन्यायकारक बदलांविरोधात पक्ष आणि संघटनांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दि. ६ मे रोजीच्या सुनावणीमध्ये दि. ९ फेब्रुवारी रोजीच्या शासन अधिसूचनेला स्थगिती दिली होती. या स्थगितीस आठवडा उलटूनही प्रवेशप्रक्रिया जुन्या नियमानुसार राबविण्यास सुरुवात झाली नाही.
अखेरीस राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शुक्रवारपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवेशाच्या प्रतीक्षेतील पालकांची प्रतीक्षा आता संपली आहे. आरटीई प्रवेशाच्या पोर्टलवर आरटीई प्रवेशास पात्र असणाऱ्या शाळा व प्रवेशासाठी उपलब्ध जागांची जिल्हानिहाय माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आरटीईच्या २५ टक्के राखीव जागांसाठी नवीन प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून (दि. १७) सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करता येईल. ज्यांनी २५ टक्केअंतर्गत नोंदणी केली आहे. त्यांना पुन्हा नोंदणी करणे आवश्यक राहील.
– शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण…











