- शासनाच्या निर्देशाचे संस्थांकडून कठोरपणे पालन..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२१) :- तुकाराम महाराज यांचा वैकुंठ गमन सोहळा अर्थात तुकाराम बीज मंगळवार (दि. ३०) साजरी होत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या वर्षी प्रथमच भाविकांविना हा सोहळा होत आहे. शासनाच्या निर्देशाचे पालन करून हा सोहळा साजरा करण्याची भूमिका संस्थानने या पूर्वीच स्पष्ट केली असल्याने पन्नास भाविकांच्या उपस्थित हा सोहळा होत आहे.
गावभर पोलिसांच खडा पहारा तैनात करण्यात आल असून गावातील सर्व प्रमुख रस्त्यांवर नाकाबंदी करण्यात आली आहे. गावात तीन दिवसांची जमावबंदी लागू करण्यात आली असून मंगळवारी रात्री बारापर्यंत लागू राहणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने पन्नास लोकांच्या उपस्थितीत सोहळा साजरा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार संस्थाने तयारी पूर्ण केली आहे.
मुख्य मंदिरातील देऊळवाड्यात तसेच वैकुंठ स्थान मंदिरासमोर मंडप उभारण्यात आला आहे. मंडपात पालखी ठेवण्यासाठी भव्य आसन तयार करण्यात आले आहे. मंगळवारी धार्मिक कार्यक्रमानंतर सकाळी साडेदहाला महाद्वारातून वैकुंठस्थान मंदिराच्या दिशेने पालखी प्रस्थान ठेवेल. वैकुंठस्थान मंदिरात पालखी प्रदक्षिणा, आरती, बीजेचे किर्तन होऊन पालखीचे पुन्हा मुख्य मंदिरात आगमन होईल, अशी माहिती संस्थांच्या वतीने देण्यात आली.