- त्रिसूत्रीची पताका खांद्यावर घेऊन केलं समाजप्रबोधन – प्रा. अशोककुमार पगारिया…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२१) :- जैन धर्मीयांचे गुरू आचार्य आनंदऋषीजी म.सा. हे केवळ जैनांचेच नाही तर सर्व आणि जातीच्या लोकांचे संत होते. प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये संस्कार रूजविण्याचे काम केले. सदाचार, संस्कार व शिक्षण अशा त्रिसूत्रीची पताका खांद्यावर घेऊन त्यांनी समाजप्रबोधन केले, असे मत प्रा. अशोककुमार पगारिया यांनी व्यक्त केले.
आचार्य आनंदऋषीजी म.सा.यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन भोसरी येथील प्रीतम प्रकाश महाविद्यालयात आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात प्रा. पगारिया यांचे व्याख्यान झाले. त्या प्रसंगी प्रा. पगारिया बोलत होते.
प्रा. सदाशिव कांबळे, पांडुरंग भास्कर, महालक्ष्मी ठुबे, प्रशांत रोकडे, स्वाती वाघ, उमेश लांडगे, विभा ब्राम्हणकर, सुधाकर भैसाणे, सचिन पवार, डॉ. विजय निकम यांनी कार्यक्रमामध्ये ऑनलाइन सहभाग घेतला.
प्रा. पगारिया म्हणाले, आचार्य आनंदऋषीजी यांनी वयाच्या केवळ तेराव्या वर्षी जैन साधु म्हणून दिक्षा घेतली. अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी देशभर पायी भ्रमण केले. त्यांनी ७८ ठिकाणी चातुर्मास केले. त्यांच्या प्रेरणेने कडा, पाथर्डी, अहमदनगर या ठिकाणी शिक्षणसंस्था स्थापन झाल्या. आचार्य आनंदऋषीजी यांचे शिष्य पू. आदर्शऋषीजी म.सा. तसेच दानशूर आणि भाविकांच्या प्रयत्नातून अहमदनगर येथे आनंदऋषीजी रुग्णालय उभे राहिले आहे. या ठिकाणी हजारो रुग्णांना मोफत आणि माफक दरात उपचार मिळत आहेत. मानवतेचे महान कार्य त्या माध्यमातून होत आहे.