- फुलझाड, फुलपाखर, पक्ष्यांची संख्याही वाढली – विजय पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ एप्रिल २०२१) :- महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट सुरु झालेली आहे. प्रशासनाने पुन्हा लॉकडाऊन च्या पर्यायाकडे पावले टाकण्यास सुरुवात केलेली आहे. याच अनुषंगाने ९ मार्च २०२१ पासून आपल्या पिंपरी चिंचवड शहरातील सर्व उद्याने नागरिकांकरिता बंद करण्यात आलेली आहेत. एरवी उद्याने नागरिकांच्या गर्दीने भरून गेलेली असतात.
या पूर्वीचा प्राधिकरणातील सार्वजनिक उद्यानातील फुलझाडांचा इतिहास पाहिला असता अनेक नागरिक पहाटेच्या सुमारास बागेतील फुलझाडांच्या कळ्याच तोडून नेत असत. त्यामुळे गेल्या अनेक वर्षात फुलझाडे कधीही फुललेली नजरेस पडत नव्हती. प्राधिकरण परिसरात उद्यानांची संख्या सुनियोजित उद्यान विकास आरखडयामुळे मोठ्या प्रमाणात आहेत.
जास्वंद, चाफा, वडेलिया या झाडांची संख्याही खूप प्रमाणात आहे. अंशतः लॉकडाऊन ९ मार्च पासून सुरू असल्याकारणाने उद्याने बंद करण्याचे आदेश देण्यात आले. त्याचा चांगला परिणाम उद्यानामध्ये पहावयास मिळाला. दिनांक १५ मार्च ते २५ मार्च २०२१ दरम्यान प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पर्यावरण विभागाच्या विजय मुनोत, विजय जगताप, विशाल शेवाळे, बाबासाहेब घाळी, संदिप सकपाळ, मंगेश घाग, अजय घाडी, नितिन मांडवे, राजेश बाबर, संतोष चव्हाण, अर्चना घाळी, अँड. विद्या शिंदे, सुनिल चोगुले, अमित डांगे, अमोल कानू, सतीश देशमुख या सदस्यांच्या अभ्यास गटाने समिती अध्यक्ष व पर्यावरण अभ्यासक विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्राधिकरण परिसरातील उद्यानांनमध्ये “कोविड काळातील पर्यावरण बदल” या विषयावर परीक्षण व निरीक्षण केले असता काही महत्वपूर्ण बदल नोंदविले.
फुलझाडे मोठ्या प्रमाणात बहरली. जास्वंद आणि चाफ्याची विविधरंगी फुले मोठ्या प्रमाणात दिसून आली. बहाव्याची पिवळी फुले निसर्गात सोनेरी रंगाची मुक्त उधळण करताना उद्यानांमध्ये दिसून येत आहेत. फुलपाखरे, मधमाशी आणि कीटकांची संख्याही त्यामुळे वृद्धिंगत झालेली आढळून आली. उद्यानाच्या मैदानी भागात मुंग्यांची छोटी छोटी वारुळेही प्रथमच मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. कोकिळा, पोपट, चिमण्या, बुलबुल,राखाडी धनुष, मैना, साळुंखि, टिटवी,केकाटे,रंगीत चिमण्या,घार या पक्ष्यांच्या संख्येमध्ये वाढ झाली. उंच खेर आणि कदंब वृक्षावरती प्रथमच घारिंची घरटी निदर्शनास आली. कोकिळे च्या ‘ कु ….हू – कु …हू ‘ आवाजामध्ये सकाळी ६ ते ९ च्या दरम्यान मोठी वाढ दिसून आली. खारूताई च्या संख्येतही वाढ नोंदवण्यात आली.
या संदर्भात पर्यावरण अभ्यासक व समिती प्रमुख विजय पाटील म्हणाले,” कोविड १९ या विषाणूने पुन्हा डोके वर काढले आहे आपल्या शहरात मार्चपासून रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या साठी गर्दीच्या ठिकाणी प्रशासनाने निर्बंध घातले आहेत.आयुक्त राजेश पाटील यांनी शहरात ९ मार्चपासून उद्याने बंद ठेवण्याचे आदेश दिले, त्याचा सकारात्मक परिणाम फुलझाडांवर दिसून आला. पक्षीही उद्यानांमध्ये मुक्त संचार करतांना दिसून आले. वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे फुलझाडांवर विपरीत परिणाम झाल्या ने पर्यावरण संतुलनही मधल्या काळात बिघडून गेले होते.कोरोना काळात निसर्ग वेगाने स्वतःमध्ये बदल करून घेत आहे असे दिसून आलेले आहे.”