- कामगारांचे ओळखपत्र पोलिसांकडून प्रमाणित होणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६. मे. २०२१) :- कामाच्या नावाखाली विनाकारण फिरणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी कंपन्यांचे ओळखपत्रदेखील आता प्रमाणित केले जाणार आहे. त्यासाठी स्थानिक पोलिसांनी हद्दीतील कंपन्यांकडून कामगारांची शिफ्टनुसार माहिती मागवली आहे. आगामी काळात नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी प्रमाणित केलेली ओळखपत्रच ग्राह्य धरली जाणार आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने विनाकारण फिरण्यावर बंधने घातली आहेत. मात्र, तरीदेखील काहीजण कंपनीचे ओळखपत्र दाखवून शहरात मोकाट फिरत आहेत. त्यांना चाप लावण्यासाठीच पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.
पिंपरी – चिंचवड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज पन्नास ते साठ जणांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. त्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिस भारतीय दंड संहिता १८८ नुसार कारवाई करीत आहेत. या कारवाईपासून वाचण्यासाठी तरुण सोबत कंपनीचे ओळखपत्र बाळगत आहेत. अनेकांच्या ओळखपत्रावर वैधतादेखील नसते. तसेच, संबंधित कामगाराच्या कामाची वेळ याबाबत माहिती उपलब्ध नसल्याने पोलिसांना कारवाई करता येत नाही. यावर उपाय म्हणून आता स्थानिक पोलिसांनी सुरू असलेल्या सर्व कंपन्यांतील कामगारांची माहिती मागवली. कंपनी व्यवस्थापनाकडून मिळालेल्या कामगारांची ओळखपत्र स्थानिक पोलिस प्रमाणित करणार आहेत. ही ओळखपत्रच नाकाबंदी दरम्यान ग्राह्य धरली जाणार आहेत. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांना चाप लागणार आहे.
हद्दीत सुरू असलेल्या कंपन्यांच्या कामगारांची माहिती मागवली आहे. त्यानुसार ओळखपत्र प्रमाणित करण्याचे काम सुरू आहे. प्रमाणित केलेली ओळखपत्रच आगामी काळात दाखवावी लागणार आहेत. अन्यथा कारवाई करण्यात येईल.
– डॉ. विवेक मुगळीकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड…