- शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकानांची वेळमर्यादा वाढणार..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५. जून. २०२१) :- राज्यात सोमवार ७ जून पासून ५ टप्प्यांमध्ये अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. करोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावरच आता निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. त्यासाठी एकूण पाच स्तर निश्चित करण्यात आले आहेत. शुक्रवारी मध्यरात्री सरकारकडून अनलॉकचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
या पाच गटांत जिल्ह्यांची वर्गवारी
पहिला गट :- अहमदनगर, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, ठाणे, वर्धा.
ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि ऑक्सिजन बेड २५ टक्केपेक्षा कमी भरलेले आहेत. त्यांचा पहिल्या गटात समावेश केला जाणार आहे. या भागात सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होणार. मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहेसुद्धा नियमितपणे सुरू होणार. रेस्तराँ सुरू करण्यासाठीही परवानगी. लोकल सेवा पूर्ववत होईल मात्र, स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागास निर्बंध घालण्याची मुभा असेल. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा. शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेनं सुरू राहतील. विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल. लग्न सोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतेही बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी असणार आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत असेल करण्यात आली आहे. या भागात जमावबंदीही नसणार आहे.
दुसरा गट :- औरंगाबाद, गडचिरोली, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी.
पॉझिटिव्हिटी दर हा ५ टक्के आणि २५ ते ४० टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन बेड्स भरले आहेत अशा जिल्ह्यांचा समावेश या गटात केला जाणार आहे. या गटात जे जिल्हे असतील तिथे सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ सुरू राहतील. मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे ५० टक्के क्षमतेनं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. रेस्टॉरंटसाठीही ५० टक्के क्षमतेने परवानगी. लॉकल सेवा फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी. सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल. सर्व खासगी कार्यालये उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील. विविध खेळांसाठी सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ अशी वेळ राहील. चित्रीकरण नियमितपणे करता येईल. सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ५० टक्के उपस्थितीची मर्यादा असेल. लग्न सोहळ्यासाठी हॉलमधील आसनक्षमतेच्या निम्मे किंवा जास्तीत जास्त १०० जणांच्या उपस्थितीत परवानगी असेल. अंत्यविधीसाठी कोणतेही बंधन नसेल, बैठका, निवडणूक यावरही कोणतीच बंधने नसतील. जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना ५० टक्के क्षमतेने परवानगी. सार्वजनिक वाहतूक सेवा १०० टक्के क्षमतेने सुरू होईल. आसन क्षमतेइतकेच प्रवासी प्रवास करू शकतील. या भागात जमावबंदी लागू असेल.
तिसरा गट – अकोला, अमरावती, बीड, वाशिम, यवतमाळ.
पॉझिटिव्हिटी दर हा ५ ते १० टक्के किंवा ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले आहेत असे जिल्हे तिसऱ्या गटात असणार आहेत. सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व अत्यावश्यक दुकाने खुली ठेवण्यास मुभा असेल. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरू तर वीकेंडला बंद राहतील.
चौथा गट – पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, कोल्हापूर.
पॉझिटिव्हिटी दर हा १० ते २० टक्क्यांदरम्यान किंवा ऑक्सिजन बेड्स ६० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहेत असे जिल्हे चौथ्या गटात असणार आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकाने चार वाजेपर्यंत सुरू राहतील तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने पूर्णपणे बंद राहणार आहेत.
पाचवा गट
पॉझिटिव्हिटी दर हा २० टक्क्यांपेक्षा अधिक किंवा ७५ टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड्स व्यापलेले आहेत असे जिल्हे या गटात समाविष्ट केले जाणार आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोमवार ते शुक्रवार ४ वाजेपर्यंत सुरू राहतील तर वीकेंडला मेडिकल सोडून बाकी सर्व दुकाने बंद राहतील.