- परिसरातील ७ ठिकाणं वगळता इतरत्र दिव्याखाली अंधार..
- नागरिकांचा पुढाकार असतानाही पालिकेचे दुर्लक्ष…
- सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांचे आयुक्तांना निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ ऑगस्ट २०२१) :- प्रभाग क्रमांक २२ काळेवाडी, विजयनगर परिसर विस्तारत आहे. त्यामुळे प्रभागातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हत्या करून पसार होणारे गुन्हेगार, भुरट्या चोरट्यांनी येथे उच्छाद मांडला आहे. बंद घर पाहून घर फोडण्याच्या प्रमाणातही दिवसेंदिवस वाढ होत आहे. यावर उपाय म्हणून पोलीस खात्याने पेट्रोलिंग वाढवण्यावरही भर दिला. यावरही मात करीत काही गुन्हेगार वेगवेगळी शक्कल लढवून गुन्ह्यांची व्याप्ती वाढवतच आहेत.
पोलीस आपली जबाबदारी पार पाडत असताना यात पालिकेचाही सहयोग महत्त्वाचा आहे. सुरक्षेच्या दृष्टीने चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) बसविणे गरजेचे असताना पालिकेकडून महत्वाच्या ३ चौकातील ७ ठिकाणं वगळता इतरत्र दिव्याखाली अंधारच पहायला मिळतोय, अशी टीका सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर यांनी महापालिका प्रशासनावर केली आहे.
तापकीर म्हणाले, हा परिसर काळेवाडी पोलीस चौकीअंतर्गत येतो. परिसरातील काही चौकात सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV) नसल्यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यास त्या घटनेबाबत पोलिसांना तपासकार्यात अडथळे येतात. काही महिन्यांपूर्वीच काळेवाडीत दुहेरी हत्याकांडची घटना घडली होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्याअभावी गुन्ह्याचा तपास करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. अद्याप गुन्हेगार फरार आहेत. संबंधित चौकात कॅमेरे असता तर, तपासाला वेग मिळाला असता. परिसरातील काही कॉलनी परिसरात नागरिकदेखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र, पालिकेचे दुर्लक्ष होतेय. त्यामुळे शहरातील वाढती गुन्हेगारी थोपवण्यासाठी नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून महापालिकेने गर्दीच्या सर्वच ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरा बसवावेत, अशी मागणी तापकीर यांनी पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेद्नाद्वारे केली आहे.