- ‘टाटा मोटर्स’ ला सेवा पुरविणाऱ्या कंपनी मालकाकडे खंडणीची मागणी..
- माथाडी बोर्ड व पोलीस आयुक्त संबंधितांवर कारवाई करणार?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ सप्टेंबर २०२१) :- उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या काही वर्षांपासून माथाडी कामगार संघटनांच्या नावाखाली अनेक ‘उद्योग’ सुरू झाले आहेत. बड्या व्यावसायिकांची अडवणूक करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करण्याचे प्रकार घडत आहेत. उद्योजकांना आता माथाडी कामगारांचा जाच होऊ लागला आहे. त्याचे लोण आता शहरातील उद्योगांची जीवनदाहिनी असणाऱ्या ‘टाटा मोटर्स’ कंपनीपर्यंत पोहोचले आहे. टाटा मोटर्स कंपनीला सेवा पुरविणाऱ्या थरमॅक्स चौकातील प्राज कंपनीत दिवसाढवळ्या स्वतःला माथाडी कामगारांचा मसीहा समजणाऱ्या टोळक्याने धुडगूस घालून कार्यालयात काम करणारे कर्मचारी, महिलेचा विनयभंग करीत मालकाला धमकी देत दहशत निर्माण केली आहे.
माथाडी कामगारांना देत असलेले दरपत्रक दाखव. नाहीतर तुझ्याकडे बघून घेऊ. आत्ता आम्ही पाचजण आलोय. उद्या १०० ते २०० जणांना घेऊन येतो का नाही ते बघ’ असे म्हणत संबंधित आरोपींनी कंपनीच्या मालकाकडे महिन्याला पन्नास हजारांची खंडणी मागितलीयं. पैसे न दिल्यास कंपनीत काम करू देणार नाही. ठेकेदारी बंद पाडून टाकू. दुस-यांना काम दिले तर त्यांना व तुला बघून घेऊ अशी धमकीही त्यांना दिली आहे. या त्रासाला वैतागून अखेर उद्योजकाने निगडी पोलिस ठाणे गाठून सहा जणांच्या टाळक्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
एखादी माथाडी संघटना जर दहशत माजवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याची तक्रार करावी. आस्थापनांनी कोणत्याही माथाडी कामगार संघटनेच्या दबावाला बळी पडू नये, असे आवाहन पोलीस आयुक्तांकडून करण्यात आले होते. पूर्वी ‘इंडस्ट्रिअल रिलेशन सेल’ची माजी पोलिस आयुक्तांकडून स्थापना करण्यात आली होती. या ‘सेल’ चे पुढे काय झाले? माथाडीतील समाजकंटकांना कोण आवर घालणार? सातत्याने होणाऱ्या पैशांच्या मागणीमुळे व्यावसायिकहीं त्रस्त झाले आहेत. मात्र त्यांच्याविरुद्ध तक्रार केल्यास जीवितास धोका निर्माण होण्याची किंवा मालाची-वस्तूंची तोडफोड, नासधूस किंवा चोरीची भीती व्यावसायिकांना असते. त्यामुळे ते पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. संघटनांच्या दहशतीखालीच आणि मनमानीखाली उद्योग व आस्थापनांच्या मालकांना राहावे लागते. मात्र, या घटनेत व्यवसायिक तक्रार देण्यासाठी पुढे आल्यामुळे पोलीस आयुक्त व माथाडी मंडळ सबंधित आरोपींवर काय कारवाई करणार? याकडे कामगार क्षेत्रातील जाणकारांचे लक्ष लागले आहे.
माथाडी बोर्डाचे चेअरमन बाळासाहेब वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला या घटनेची कोणतीच कल्पना नसल्याची माहिती दिलीयं.