- करोडो रुपये खर्चूनसुद्धा शहरातील पवना, इंद्रायणी नदींचा प्रश्न जैसे थे..
- नदी दिनानिमित्त प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीकडून पवना नदीचे पुजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२१) :- पवना नदी पिंपरी चिंचवड शहराची जीवनदायिनी आहे. यंदाच्या वर्षी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरणही १०० टक्के क्षमतेने भरले. पवना नदी सुद्धा सध्या मोकळा श्वास घेऊन वाहत आहे. जागतिक नदी दिनाच्या निमित्ताने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने पवना नदीचे पुजन करण्यात आले. या प्रसंगी समिती अध्यक्ष विजय पाटील, महिला अध्यक्षा अर्चना घाळी दाभोळकर, विभाग प्रमुख विशाल शेवाळे, संतोष चव्हाण, बाबासाहेब घाळी, सतीश बाबर प्रमुख उपस्थित होते.
रावेत येथील नदी परिसरात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीने स्वछता मोहीम राबवली. परिसरातील निर्माल्य महापालिकेच्या निर्माल्य कुंडात जमा केले गेले. त्याचप्रमाणे शहराला जीवन देणाऱ्या पवना नदीची ओटी भरून व नारळ वाहून पूजन करण्यात आले.
विजय पाटील म्हणाले,” जागतिक नदी दिनानिमित्त भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात च्या माध्यमातून जगामध्ये संदेश पोहोचवत असताना, राज्य प्रशासन व पालिका प्रशासन मात्र ढिम्मच राहिले. महापालिका प्रशासन आणि सत्तेतील अंमलदार यांनी ह्या महत्वाच्या विषयाकडे साफ दुर्लक्ष केले आहे. नदी स्वच्छतेकरिता शहरातील अनेक संस्था सरकारी पैसे न घेता स्वयंप्रेरणेने कार्यरत आहेत. तर, दुसरीकडे पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन मात्र कासवगतीने प्रयत्न करत आहे. पिं चिं शहराला वरदान ठरलेल्या पवना व इंद्रायणी नद्या आपण किती साफ ठेवू शकलो याचे आत्मचिंतन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी करणे आवश्यक आहे. नदी स्वच्छतेबाबत अद्यापही “एक आराखडा” १० वर्षात प्रशासनाला तयार करता आलेला नाही. २८ लाख जनतेची तहान भागवणाऱ्या पवणेची दुरवस्था होण्यास आपण सगळेच कारणीभूत आहोत. सांडपाणी नाल्यातून सरळ नदीत जात असल्याने प्रदूषण जास्त वाढत आहे. पालिका करोडो रुपये खर्चून सुद्धा जलपर्णी चा प्रश्न हद्दपार करू शकली नाही. दर वर्षी ठेकेदारांना बिले मात्र वेळेवर अदा केली जातात. अनावश्यक विषयांकरिता “स्थायी” समितीमध्ये कोट्यवधी रुपये संमत केले जातात. पण जीवनदायिनी नदी स्वच्छतेबाबत एवढी अनास्था का? याचा जाब यापुढे सर्वसामान्य करदाते विचारतील यात शंका नाही.”
विभाग प्रमुख विशाल शेवाळे म्हणाले,” पिंपरी चिंचवड शहरातील लोकप्रतिनिधींनी “इंदोर” दौरा किंवा “परदेश दौरा” करण्याऐवजी नदी स्वच्छतेकरिता स्वखर्चाने एकदा अरुणाचल व सिक्कीम दौरा करावा, नदी स्वच्छता म्हणजे काय असते ते नेमके अनुभवता येईल. यापुढे “जागतिक नदी दिनाकडे” प्रशासनाने पाठ फिरवू नये असेच पर्यावरण प्रेमींना वाटते.