- ज्यांनी शहराचे भवितव्य घडविले, त्यांच्या हाती नेतृत्त्व द्या..
- रहाटणीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात शरद पवारांचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२१) :- पिंपरी-चिंचवड शहरात सत्तेच्या माध्यमातून लूट सुरू आहे. भाजपाला सत्तेपासून दूर करण्याची वेळ आली आहे. देशातील या बदलाची सुरुवात पिंपरी-चिंचवडपासून होण्याची गरज आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर करत ज्यांनी शहराचा विकास केला, भवितव्य घडविले त्यांच्या हाती नेतृत्त्व द्या, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी केले.
रहाटणीतील थोपटे लॉन्स येथे रविवारी (दि. १७) येथे पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी महापौर आझम पानसरे, योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, कैलास थोपटे, विशाल वाकडकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व सेलचे आजी-माजी पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले, राज्यात कारखानदारी अधिकाधिक निर्माण झाली पाहिजे, सर्वाधिक हातांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यासाठी व्यापक धोरणाची गरज आहे. सध्या असलेल्या औद्योगिक धोरणात बदल करण्यात येणार असून याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. ठाकरे सरकार हे राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेत असल्याने अस्वस्थ असलेल्या भाजपकडून राज्याला आर्थिक अडचणीत आणण्यासाठी रोजच प्रयत्न केले जात आहेत. मात्र, हे सरकार ही पाच वर्षांची टर्म पूर्ण करेल इतकेच नव्हे, तर पुढील सरकारही महाविकास आघाडीचेच असेल.
ईडी, सीबीआय, एनसीबी अशा संस्थांकडून राज्यातील नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. मात्र त्यातूनही सरकार पडत नाही म्हणून ‘पवारांना’ त्रास देण्याचा उद्योग सुरू आहे. यातूनही त्यांच्या हाती काहीच लागणार नाही, याची मला खात्री आहे. असे प्रकार जास्तदिवस चालत नसतात. लोकशाहीमध्ये सर्वकाही जनतेच्या हाती असते. चुकीची कामे करणाऱ्यांना जनतेने यापूर्वीही धडा शिकविला आहे. केंद्रातील भाजप सरकारलाही जनता धडा शिकवेल, त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. जनमानसातून भाजपच्या चुकीच्या कामाला विरोध करण्याची जबाबदारी घ्या, असे आवाहनही पवार यांनी यावेळी केले.