- अंत्यसंस्कारासाठीची मर्यादाही हटविली; राज्य सरकारचा निर्णय…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२२) :- राज्यातील निर्बंध पुन्हा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. त्यानुसार मंगळवारपासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २०० लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.
ओमायक्रॉनचा धोका वाढू लागताच १० जानेवारीपासून दिवसा जमावबंदी तर रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्याचप्रमाणे लग्नसमारंभापासून सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांमधील लोकांच्या उपस्थिती संख्येवर निर्बंध लागू करण्यात आले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यभरातील करोनाबाधितांचा आलेख घसरत आहे.
शाळा- महाविद्यालये सुरू करण्यात आली असून आता अन्य निर्बंधही शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार अंत्यसंस्कारासाठी २० व्यक्तींची मर्यदा हटविण्यात आली असून, आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल. करमणूक पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क ५० टक्के क्षमतेने, उपाहारगृह, नाटय़गृह, चित्रपटगृहे स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत ५० टक्के क्षमतेने, मनोरंजनात्मक कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने, खुल्या मैदानात किंवा सभागृहात क्षमतेच्या २५ टक्के किंवा २०० लोकांना प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली आहे.