- अखेर आयुक्तांचे घुमजाव; पालिकेचा पैसा वाचणार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी २०२२) :- स्मार्ट सिटीअंतर्गत औंधच्या राजीव गांधी पूल ते जगताप डेअरी चौकापर्यंतच्या रस्त्याचे अर्बन स्ट्रीट डिझाइननुसार काम करण्यात येणार होते. ते सुमारे ४० कोटींचे काम स्मार्ट सिटीचे ठेकेदार बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शनला थेट पध्दतीने देण्याचा घाट सत्ताधारी भाजपने घातला होता. मात्र, तक्रारीनंतर आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी त्यासाठी निविदा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सत्ताधा-याच्या चुकीच्या कामास ब्रेक लागला आहे, अशी माहिती शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी शुक्रवारी (दि. ४ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे उपस्थित होते.
कलाटे म्हणाले की, औंध ते किवळे या १४ किलोमीटर अंतराच्या बीआरटीएस रस्ता चांगल्या स्थितीत आहे. असे असतानाही नागरिकांची मागणी नसताना या रस्त्याचे अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार काम केले जात आहे. तसेच ड्रेनेज समपातळीवर करुन डांबरीकरण केले जाणार आहे. त्यासाठी एकूण सुमारे १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. कामाची गरज नसताना केवळ टक्केवारीसाठी सत्ताधा-यांनी काम काढले आहे. ते काम ठराविक ठेकेदाराला थेट पध्दतीने देण्याचा घाट सत्ताधा-यांनी घातला आहे. त्याबाबत आयुक्तांकडे तक्रार करीत सुनावणीची मागणी केली होती. या तक्रारींची दखल घेत औंध ते जगताप डेअरी रस्ताचे काम थेट पध्दतीने न देता निविदा काढण्यात येणार असल्याचे उत्तर आयुक्तांच्यावतीने स्मार्ट सिटीते महाव्यवस्थापक अशोक भालकर यांनी दिले आहे.यावेळी आयुक्तांच्या भूमिकेमुळे सत्ताधा-यांच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचाराल ब्रेक लावला आहे. तसेच त्या रस्त्यावर गेल्या दहा वर्षांत मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आलेला असूनही खोटी माहिती देणा-या बीआरटीएस विभागाची चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.
शितोळे म्हणाले, भाजपच्या पाच वर्षांच्या काळात हे पहिलेच काम आयुक्तांनी थांबविली आहे. निविदा काढून काम केल्याने खर्च २५ ते ३० टक्क्यांनी कमी होईल. दापोडी ते निगडी मार्गावर खर्च न करता, जेथे दुरुस्ती करता येईल, तेथे करुन बचत करावी, असा सल्ला प्रशांत शितोळे यांनी दिला आहे.