न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२२) :- कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना राज्य सरकारच्याने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत घोषित केली मात्र, महापालिकेने पाठविलेल्या एकूण अर्जांपैकी त्रुटी असलेले ६४० अर्ज बाद झाले आहेत.
शहरामध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये तब्बल तीन लाख नागरिकांना कोरोनाची लागण झाली. यात अनेकांचा कोरोनाने मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाइकांस ५० हजार रुपये सानुग्रह साहाय्य राज्य आपत्ती निधी मिळणार होता. त्याबाबतचे अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया डिसेंबरपासून सुरु झाली. मदतीची रक्कम लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी मृत्यू झालेल्या रुग्णाच्या नातेवाइकांनी राज्य सरकारच्या वेब पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करायचे होते.
महापालिका अंतर्गत सहाय्यासाठी सहा हजार ५९ रुग्णांच्या नातेवाइकांनी अर्ज केले होते. त्यापैकी ६४० जणाचे अर्ज बाद झाले. कोरोनामुळे व्यक्तीचा मृत्यू हा रुग्णालयात अथवा रुग्णालयाच्या बाहेर झाला असला, तरी ही मदत देण्यात येणार आहे. कागदपत्रामध्ये झालेली चूक, आधारकार्ड नंबर चूकल्याने अर्ज बाद झाले. हा अर्ज करताना अर्जदाराने स्वत:चा तपशील, आधार क्रमांक, अर्जदाराचा बँक तपशील, मृत पावलेल्या व्यक्तीचे जन्म व मृत्यू नोंदणी प्रमाणपत्र व इतर नातेवाईकांचे ना हरकत स्वयं घोषणापत्र देणे बंधनकारक होते.