न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ फेब्रुवारी २०२२) :- प्रत्येक काळात शोषित समाज असतो. शोषणाविरुद्ध लढा देण्यासाठी क्रांतीची आवश्यकता असते. अशा क्रांतीचे नेतृत्व करून शिवरायांनी रयतेचे सुराज्य स्थापन करण्याचा इतिहास रचला, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात करण्यात आले आहे. या प्रबोधन पर्वामध्ये पिंपरी चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आपले मनोगत व्यक्त केले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यासह नगरसदस्या सुलक्षणा धर, माजी नगरसदस्य मारोती भापकर, जनता संपर्क अधिकारी किरण गायकवाड तसेच शिवजयंती उत्सव समितीचे जीवन बोराडे , सागर तापकीर, अभिषेक मस्के, दत्तात्रय शिंदे, दादा पाटील, सतीश काळे, नकुल भोईर, धनंजय येळवंडे ,प्रकाश जाधव, अॅड रानवडे आदी उपस्थित होते.
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची प्रत्येक गोष्ट अनुकरणीय आणि वंदनीय आहे. भारतीय संविधनातील आधुनिक मूल्य स्वातंत्र्य, समता, न्याय, धर्मनिरपेक्षता, लोकशाही इत्यादी तत्वे चारशे वर्षांपूर्वी महाराजांच्या राज्यकारभारात अस्तित्वात होते असेही ते म्हणाले.
या दरम्यान मराठी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी छत्रपती शिवराय आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक जडण घडण या विषयावर बोलताना म्हणाल्या, मराठी मातीमध्ये संस्कृती पेरण्याचे कार्य शिवरायांनी केले. या मातीमध्ये जन्माला आल्याचा अभिमान असून जीवनात संघर्ष करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात केल्यास जीवनाचे सोने नक्की होईल. विविधता हे शिवाजी महाराजांच्या राज्याचे वैशिष्ठ्ये होते, असे उदगारही त्यांनी काढले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्दिष्टाने पालिकेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सदर कार्यक्रम ऑनलाईन पध्दतीने होत आहेत. या कार्यक्रमांचे थेट प्रसारण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.facebook.com/pcmcindia.gov.in
या अधिकृत फेसबुक पेजवरून आणि pcmcindia या यूट्यूब चॅनेलवरुन होत आहे. या लिंक्सद्वारे नागरिकांनी सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.












