- पर्यावरणप्रेमींच्या वृक्षलागवडीच्या प्रयत्नांना यश; पक्षी व फुलांचा “वसंतोत्सव” सुरू….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० मार्च २०२२) :- जून २०२० मध्ये आलेल्या “निसर्ग” वादळामुळे पिंपरी चिंचवड तसेच पुणे शहरात अनेक झाडे उन्मळून पडली होती. वादळाचा फटका उद्यानातील झाडांनाही बसला होता. प्राधिकरणातील संत ज्ञानेश्वर उद्यानातील काही झाडे सुद्धा मुळासकट उन्मळून पडली होती. त्यांना पुनर्जीवन मिळावे म्हणून प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या अर्चना घाळी, विशाल शेवाळे, अजय घाडी, राजेश बाबर, नितीन मांडवे, संतोष चव्हाण या पर्यावरण विभागाच्या सदस्यांनी ४ जुलै २०२० रोजी झाडांचे पुन:र्रोपण केले होते. त्यातील बहुतांशी झाडांना जीवदान मिळाले. त्यातीलच एक नक्षत्र वृक्ष म्हणजे पळस, उन्मळून पडलेल्या पळसाच्या दोरखंडाच्या साह्याने पुन्हा सुस्थितीत उभे केल्यामुळे त्याला पालवी फुटली आणि मनमोहक केशरी रंगाच्या फुलांनी बहरलाही.
आज म्हणजेच वसंत ऋतूच्या प्रारंभी अनेक पक्षी फुललेल्या पळसाच्या ताटव्याचा आस्वाद घेण्यासाठी आकर्षित होत आहेत. पळसाचे आणि पोपटाचे तर विशेष नातेच असते, केशरी फुलांमुळे सकाळच्या सुमारास पोपटाची हजेरी ही ठरलेली असते. माघ आणि फाल्गुन महिन्याच्या सुरवातीलाच सुंदर केशरी रंगाचे ताटवे रंगीत पक्षी, चिमण्या आणि पोपटांना आकर्षित करत असतात. समितीच्या सदस्यांच्या वृक्ष संवर्धन मोहिमेला यामुळे विशेष यश प्राप्त झाले आहे.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष व पर्यावरण अभ्यासक विजय पाटील म्हणाले, “पळस हा पानझडी नक्षत्र वृक्ष असून, कमी पाण्यामध्ये तो वाढतो. त्यामुळे उष्ण वातावरणात तग धरून राहतो. आपल्याकडे लाल आणि केशरी पळस जास्त प्रमाणात दिसून येतात. विदर्भात सदरच्या वृक्षांची संख्या जास्त आहे. पळस हा बहुउपयोगी वृक्ष आहे. पांढरा आणि पिवळा पळस दुर्मिळ समजला जातो. आयुर्वेदात पळसाच्या सालीचा तसेच पानांचा व फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. केशरी फुलांना वाळवून नैसर्गिक रंग तयार केला जातो. ग्रामीण भागात याच रंगांचा वापर धुळवड व रंगपंचमीला होत असतो. पत्रावळी, द्रोण, बिडी बनवण्यासाठी सुद्धा ग्रामीण भागात याचा वापर केला जातो. हिंदू धर्मात या वृक्षाला विशेष महत्व आहे. अश्या वृक्षांची आपल्या शहरात जास्तीत जास्त लागवड होणे आवश्यक आहे. त्यामुळे पक्षी, कीटक, खारुताईसाठी अन्नसाखळी मजबूत होऊन त्यांचा अधिवास वाढण्यास मदत होते. जैव विविधतेला बळ मिळते.”