- शनिवारी पूर्णवेळ तर रविवारीही ऐच्छिक; शिक्षण विभागाचे निर्देश?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२२) :- राज्यभरातील शाळांतील पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग एप्रिलपर्यंत पूर्णवेळ आणि शंभर टक्के उपस्थितीने सुरू ठेवण्याचे निर्देश शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी दिले. त्यात शनिवारी पूर्णवेळ तर रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवता येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा राज्यातील शाळा प्रत्यक्ष स्वरूपात ऑक्टोबरपासून सुरू झाल्या. आता करोना रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्यातील आस्थापने आणि कार्यक्रमांवरील निर्बंध टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू ठेवण्यासंदर्भातील परिपत्रक गुरुवारी प्रसिद्ध केले.
सर्वसाधारणपणे मार्चपासून सकाळच्या सत्रात शाळा भरवण्यास परवानगी दिली जाते. या शैक्षणिक वर्षांत मार्चपासून एप्रिलअखेपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात करण्याऐवजी पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग असलेल्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवाव्यात. एप्रिलअखेपर्यंत शाळा शनिवारी पूर्णवेळ, रविवारी ऐच्छिक स्वरूपात सुरू ठेवता येईल. पहिली ते नववीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ात घेऊन निकाल मेमध्ये जाहीर करावा असे नमूद करण्यात आले आहे.