- रेल्वे लगतच्या झोपडपट्टीवासीयांचा प्रश्न अधांतरीच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२२) :- राज्य सरकार आणि महापालिकेकडून रेल्वे लगतच्या झोपडपट्टीवासीयांचे विशिष्ट कालमर्यादेमध्ये पुनर्वसन करणार, अशी हमी रेल्वे प्रशासनाला मिळाली तर, रेल्वे प्रशासन या कारवाईबाबत निश्चित पुनर्विचार करेल, असे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी संघर्ष समितीला दिले आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची घर हक्क संघर्ष समितीने भेट घेतली. या वेळी रावसाहेब दानवे म्हणाले, सर्वोच्च निर्णयानुसार या नोटिसा रेल्वे देत आहे. नोटीस दिली म्हणजे लगेच तुमच्यावर कारवाई होईल, असे अजिबात नाही. हा कायदेशीर की न्यायालयाच्या प्रशासन प्रक्रियेचा भाग आहे. राज्य शासन आणि महापालिकेकडून या संबंधित विशिष्ट झोपडपट्टीवासीयांचे कालमर्यादिमध्ये पुनर्वसन करणार, अशी हमी रेल्वे प्रशासनाला मिळाली तर रेल्वे प्रशासन या कारवाईबाबत निश्चित सकारात्मक पुनर्विचार करेल.
घर हक्क संघर्ष समितीच्या वतीने अल्पबचत भवन, पुणे येथे रामदास आठवले यांची भेट घेतल असता, मी रेल्वेमंत्री वैष्णव व रेल राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी या प्रश्नाबाबत सकारात्मक तोड़गा निघावा यासाठी प्रयत्न करीत आहे, असे आठवले यांनी सांगितले. या वेळी माजी मंत्री बाळा भेगडे, माजी नगरसेवक मारुती भापकर, प्रसाद शेट्टी, चंद्रकांता सोनकांबळे, नेताजी शिंदे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.