न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ फेब्रु.) :- सध्या अनेकांसमोर वाढते वजन, मधुमेहाचा मोठा प्रश्न आहे. वजन वाढले. मधुमेह वाढला. आता त्यावर नियंत्रण कसे ठेवावे, वजन कसे कमी करावे, या चिंता माणसाला सतावतात. वजन आणि मधुमेह यापासून दूर राहायचे असेल, तर सर्व काही खा; परंतु खाण्यावर नियंत्रण ठेवा, बकाबका खाऊ नका, दिवसातून दोन वेळा खा, योगा, व्यायाम आणि पायी फिरण्याकडे लक्ष द्या, असा मोलाचा सल्ला प्रसिद्ध डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी पिंपरी-चिंचवडकरांना दिला.
आमदार लक्ष्मण जगताप मित्र परिवाराच्या वतीने भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळेसौदागरमध्ये आयोजित विनासायास वेटलॉस आणि मधुमेह प्रतिबंध या विषयावर डॉ. दिक्षीत बोलत होते. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, प्रतिभा महिला प्रतिष्ठानच्या संस्थापिका अश्विनी लक्ष्मण जगताप, नगरसेवक शत्रुघ्न काटे, हर्षल ढोरे, नामदेव ढाके, नगरसेविका निर्मला कुटे यांच्यासह भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते. डॉ. दिक्षीत यांच्या व्याख्यानाला नागरिकांचीही अलोट गर्दी झाली होती.
डॉ. दिक्षित म्हणाले, “वजन का वाढत आहे, याचा विचार करा. मुले सर्रास कोल्ड्रिंक्स, बर्गर, पिझ्झा खाताना दिसतात. वय, लिंग, आनुवंशिक घटक, सामाजिक-आर्थिक परिस्थिती, मेहनतीचा अभाव, भोजन बनविण्याची पद्धती, शिक्षण, हार्मोन्स, मद्यपान, धूम्रपान, वंश आदी वजन वाढण्याची कारणे आहेत. अनेकांना वजन कमी करायचे असते. परंतु त्यासाठी शारीरिक श्रम अनेकांना नको असतात. त्यांना शॉर्टकट पद्धत हवी असते. वजन कमी करायचे असेल, तर एक दिवस उपवास करा, रात्री केवळ फळ खा, रसाहार, निराहार करा, दर तीन तासांनी थोडेथोडे खा, तसेच आयुर्वेदिक, होमिओपॅथीची औषधे घ्या.
खाण्यासाठी जीवन जगू नका, तर जगण्यासाठी खा. जे काही खायचे आहे, ते खा. परंतु दिवसातून दोन वेळा खा, तुम्ही काहीही खाल्ले तरी शरीरात इन्सुलिन निर्माण होते. वजन आणि मधुमेहाला प्रतिबंध करायचा असेल, तर खूप भूक लागण्याच्या दोन वेळा ओळखा, भोजनाची वेळ निश्चित करा आणि त्याच वेळेत भोजन करा. तसेच ५५ मिनिटांमध्ये भोजन संपवा, असे सांगत त्यांनी दोन भोजनाच्या मधात काही खाऊ नका आणि भोजनात गोड कमी खा, भोजनात प्रोटिन्स वाढविण्याचा सल्लाही त्यांनी दिला.