- २० लाखांच्या खंडणीसाठी चार महिन्यांपूर्वी टोळीने केले होते अपहरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ जुलै २०२२) :- पाणीपुरीची हातगाडी घेवुन घरी येत असताना १५ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अज्ञात इसमांनी २ मार्च २०२२ रोजी हिंजवडी फेज-२ येथील आयसीआयसीआय बँकेजवळील स्वराज्य पेट्रोल पंपासमोरुन अपहरण केले होते. मुलाच्या वडीलांच्या मोबाईलवर फोन करुन आरोपींनी २० लाखाची खंडणी मागितली होती. जर पैसे दिले नाही तर तुमच्या मुलाला मारुन टाकू, अशी धमकी खंडणीखोरांनी दिली होती. घाबरलेल्या मुलाच्या कुटुबीयांनी पोलीसांकडे धाव घेतली. हिंजवडी पोलिसांनी जीवाची बाजी लावून मुलाला आरोपींच्या तावडीतून सहीसलामत सोडविले.
सनी शंकर कश्यप (वय १५ वर्ष, रा. बोडकेवाडी, विप्रो सर्कल, मल्हरी बोडके यांची खोली, हिंजवडी, फेज २, ता. मुळशी, जि. पुणे) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. मुलाची आई रेखा शंकर कश्यप यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
अपहरणाची महिती मिळताच तपास पथकातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी व आजुबाजुच्या परीसरातील एकुण १८ सीसीटिव्ही फुटेज तपासले. तसेच मुलाच्या वडीलांच्या मोबाईलवर आलेल्या फोन क्रमांकाची माहिती तांत्रिक विश्लेषनाद्वारे गोळा केली असता, अपहरणात वापरली गाडी मारुती झेन असून तीचा नंबर (एमएच ०४ एक्स ४२३८) असा आहे. ही मारुती झेन कार अहमदनगरच्या दिशेने जात असल्याची तसेच त्यांच्याकडे घातक शस्त्र असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. खंडणीखोरांकडे शस्त्र असल्याने पोलिसांनी सावध पवित्रा घेतला. तपास पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र पथके तयार करुन एक पथक अहमदनगरच्या दिशेने रवाना केले. दरम्यान शिक्रापुर जवळील मलठण फाट्यावर या क्रमांकाची मारुती झेन थांबली असल्याचे दिसली. तपास पथकातील पोलीसांनी वेशांतर करुन अचानक एकाच वेळी गाडीच्या चारीही दरवाजावर झडप टाकली आणि आरोपींना शस्त्रासह ताब्यात घेतले. यावेळी अपह्रत मुलगादेखील त्यांच्या सोबत गाडीमध्ये होता. पोलीसांनी मुलाची सुखरुप सुटका केली.
लक्ष्मण नथुजी डोंगरे (वय २२ वर्ष, रा. अश्वीनीपूर तांडा, पुसद, जि. गाव वरुड, ता. यवतमाळ), ज्ञानेश्वर सचिन चव्हाण (वय २२ वर्ष, रा. अश्वीनीपूर तांडा, गाव वरुड, ता. पुसद, जि. यवतमाळ), लखन किसन चव्हाण (वय २६ वर्ष, रा. अश्वीनीपूर तांडा, गाव वरुड, ता. पुसद, जि. यवतमाळ) तसेच दोन विधी संघर्षित बालके अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक केलेले आरोपी लक्ष्मण डोंगरे, आरोपी ज्ञानेश्वर चव्हाण आणि लखन चव्हाण या तीनही आरोपीवर आर्नी, हिंजवडी आणि पुसद पोलीस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे नोंद आहेत. ते रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. आरोपींनी हिंजवडी परीसरातुन गुन्ह्यात वापरलेला मोबाईल फोन जबरदस्तीने एका इसमाकडुन चोरुन घेतला असल्याचे तसेच दुसऱ्याकडुन घड्याळ, पैसे हे देखील जबरदस्तीने चाकुचा धाक दाखवुन चोरी केली असल्याची कबुली पोलीसांना दिली आहे. आरोपींच्या ताब्यातुन ०१ लोखंडी कोयता, ०१ लोखंडी तलवार, ०५ विविध कंपन्यांचे मोबाईल फोन आणि ०१ मारुती झेन कार असा ०१ लाख ७० हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.