न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जुलै २०२२) :- दोन आठवड्यांपासून उद्योगनगरीसह मावळ परिसरात संततधार सुरू आहे. त्यामुळे पिंपरी – चिंचवड शहराची जीवनदायिनी असणारे मावळ तालुक्यातील पवना धरण पन्नास टक्के (४९.४८) भरले असून, किमान सहा महिने पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे उद्योगनगरीचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे.
मॉन्सूनचे जोरदार आगमन झाले. त्यानंतर जूनमध्ये पावसाने दडी मारली होती. मात्र, गेल्या अकरा दिवसांपासून संततधार सुरू आहे. गेल्या चोवीस तासात पवना धरण परिसरात दीडशे मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या संततधारेमुळे मावळ आणि मुळशी परिसरातील इंद्रायणी, पवना व मुळा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील काही दिवसांत मावळातील धरणे तुडुंब होण्याची शक्यता आहे.