- पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर आजपासून सुनावणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ७ सप्टेंबर २०२२) :- राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणी आज सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची रचना जाहीर करण्यात आली आहे. न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ महाराष्ट्राच्या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.
आज सकाळी साडे दहा वाजता या प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे. २३ ऑगस्टला याप्रकरणाची शेवटची सुनावणी झाली होती. मात्र, त्यानंतर या सुनावणीबाबत सातत्याने पुढील तारखा देण्यात आल्या. परंतु, आता यावर आज सुनावणी सुरू होत असल्याने या प्रकरणाची दिशा स्पष्ट होणार आहे.
शिवसेनेकडून केंद्रीय निवडणूक आयोगासमोरील कार्यवाही लांबवली जात असल्याचा आरोप करत घटनापीठापुढील सुनावणीसाठी शिंदे गटाने काल मंगळवारी सरन्यायाधीशांना विनंती केली होती. या प्रकरणी जवळपास ११ मुद्द्यांवर हे पाच न्यायाधीशांचे खंडपीठ निर्णय देणार आहे. आज निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत सुप्रीम कोर्टाची भूमिका ठरण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर हे घटनापीठ नियमित कधीपासून कामकाज करणार हे स्पष्ट होईल. सुप्रीम कोर्टाचे बेंच ठरले असून पाच न्यायाधीशांसमोर सत्ता संघर्षाची सुनावणी होणार आहे. मुख्य न्यायमूर्ती उदय लळीत यांनी पाच सदस्य खंडपीठाचे गठन केले आहे. हे पाच सदस्यीय खंडपीठ आज सकाळी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या याचिकांवर सुनावणी करेल.