न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ फेब्रु.) :- पुण्यामध्ये आपल्या मागण्यांसाठी शांततेत मोर्चा काढणाऱ्या कर्णबधीरांवर राज्य सरकारने लाठीहल्ला केला. ही घटना निषेधार्ह आहे. या मुलांचे किमान म्हणणे तरी सरकारने ऐकून घेणे आवश्यक होते, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पुण्यात गुन्ह्यांचा आलेख उंचावलाय. शहरातील गुन्हेगारांवर वचक बसविण्याची कामगिरी आपल्या सरकारने केली नाही. जेवढी तत्परता कर्णबधिरांच्या मोर्चावर लाठीहल्ला करण्यात दाखविली तेवढीच गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात दाखविली असती तर कदाचित विद्येच्या माहेरघराची अशी दुर्दशा झाली नसती.
सुप्रिया सुळे यांनी कर्णबधिरांच्या मोर्चावर लाठीहल्ल्याचे आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे. तसेच ही घटना सामाजिक न्यायाचे उल्लंघन व वंचितांच्या हक्कांची पायमल्ली करणारी आहे.या घटनेनंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरला नाही, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी केली आहे.











