- मुलांच्या स्वच्छता विषयक चित्रांनी सोसायटीत स्वच्छता मोहिमेची जनजागृती..
- बालकांसाठी प्रत्येक दिवस हा खास आणि आनंददायी – गोपाळ झा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०२२) :- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाउंडेशनच्या वतीने भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. बालदिनाचे औचित्य साधत रोजीव्हॅली सोसायटीत लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. मुलांना स्वच्छतेची शपथ देत बालदिनाचे महत्व आणि नेहरू यांच्याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. आकाशामध्ये फुगे सोडून बालदिन साजरा करण्यात आला. यावेळी मुलांना फळे वाटप करण्यात आले. पाच वर्षांपासून १६ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील मुलांनी अतिशय समर्पक चित्रे रेखाटली. टाकाऊतून टिकाऊचा संदेश, बालदिन, स्वच्छता मोहिम, व्यसनांचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, व्यसनमुक्ती, स्वच्छतेचे महत्त्व असे अर्थपूर्ण संदेश दिले.
यावेळी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई संजय भिसे, उद्योजक संजयशेठ भिसे, सोसायटीचे चेअरमन नरसिंह मंगोलि, गोपाळ झा, सचिव रुपेश भंडारे, आनंद हास्य क्लबचे राजेंद्रनाथ जयस्वाल ,खजिनदार मनीषा मुप्पिराला आणि सोसायटीतील सदस्य आणि पालकवर्ग, बालचमू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पाच वर्षांच्या वयोगटात राध्या पाठक, धन्वी मुऱ्हे, पियुष जावळे यांनी तर, सहा ते दहा वर्षीय वयोगटात सुनील सावळे, नीरज इब्विंग, श्रेया देशपांड यांनी आणि अकरा ते सोळा वयोगटात शर्वरी चव्हाण, सहर्ष कोठ्वाडे, म्रीन्मयी महाजन यांच्या चित्रांना क्रमवारीनुसार प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देण्यात आले.
कुंदाताई भिसे म्हणाल्या, स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये पिंपरी चिंचवड शहर देशात अव्वल स्थानावर येण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. मुलांना स्वच्छतेचे महत्त्व समजावले तर नक्कीच शहराची वाटचाल कचरा मुक्तीकडे होईल. बालवयातील विद्यार्थ्यांना चांगले आणि वाईट यातील फरक कळावा हा चित्रकला स्पर्धा घेण्याचा हेतू होता. अनेक मुलांनी स्वच्छता मोहिमेवरील चित्रे रेखाटली. त्यामुळे सोसायटी वर्गात स्वच्छता विषयक जनजागृती झाली आणि पालिकेच्या मोहिमेला हातभार लागला.
गोपाळ झा म्हणाले, लहान मुल म्हणजे नेहरूंचा जीव की प्राण. “मुलं म्हणजे देवा घरची फुलं” असं ते कायम म्हणायचे. मुलांवरील त्यांचं अपार प्रेम पाहता हा दिवस त्यांच्या जयंतीनिमित्तानं भारतात बालदिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. पंडित नेहरूंना मुलांविषयी वाटणार्या प्रेम आणि जिव्हाळ्याविषयी आदर व्यक्त करण्याचा हा मार्ग आहे. खरंतर बालकांसाठी प्रत्येक दिवस हा खास आणि आनंददायी असतो. मात्र, या दिवशी लहान मुलं आपला आनंद इतरांबरोबर अधिक उत्साहीपणे साजरा करतात. या दिवशी पालकांनीही मुलांना बालदिन नेमका का साजरा करतात याची विशेष जाणीव करून देणे गरजेचे आहे.