- मेरीटनुसारच तिकीट दिले जाईल, अजित पवारांची स्पष्टोक्ती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ डिसेंबर २०२२) :- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या कार्यकर्त्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र, महाराष्ट्रातील महापुरुषांचे व महिलांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे राज्यपाल, भाजपचे नेत्यांवर महापुरुषांचा अपमान केला म्हणून गुन्हा दाखल केला जात नाही, असा सवाल विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.
अजित पवार म्हणाले, ‘कोणावरही शाई फेक करणे चुकीचे आहे. त्याचे मी समर्थन करीत नाही. मात्र, चळवळीतून घडलेल्या आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांना शाळा बांधण्यासाठी देणगी, वर्गणी, लोकसहभागातून महापुरुषांनी निधी गोळा केला, असे म्हणता आले असते. त्यांनी खांद्यावरील रूमाल काढून त्याची झोळी करीत भीक मागण्याची कृती करून दाखविली. अपमानजनक उद्गार काढले, हे चुकीचे आहे. शाई फेकीनंतर एका खासगी कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी “पोलिसांवर कारवाई करू नका, असे वक्तव्य केले. मात्र, काही तासांतच ११ पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. प्रभावी देश व राज्यातील पत्रकारिता सध्या दबावात काम करीत आहेत, असा आरोप त्यांनी केला. कर्नाटक सीमा, महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले जात आहेत. या प्रकाराच्या निषेधार्थ शनिवारी (दि. १७) आयोजित मोर्चात मोठ्या रस्त्यावर उतरून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. या प्रकाराच्या निषेधार्थ शनिवारी (दि. १७) आयोजित मोर्चात मोठ्या रस्त्यावर उतरून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च व उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी सुरु आहे. महापालिकेच्या निवडणुका केव्हाही लागू शकतात. पदाधिकारी व कार्यकत्यांनी तयारीत राहावे, अशा सूचना करत, मेरीट असलेल्यांना तिकीट दिले जाईल, असा स्पष्ट इशारा विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी वाल्हेकरवाडी, चिंचवड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचार वैध मेळाव्यात रविवारी (दि. ११) दिला.
यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे, नेते आझम पानसरे, माजी महापौर संजोग वाघेरे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, पदाधिकारी, माजी नगरसेवक आदी उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, कोणीही सत्तेचे ताम्रपत्र घेऊन जन्मालाआलेले नाही. कोणीही भ्रमात राहू नये. हिमाचल निकालावरून ते स्पष्ट होते. मला अमूक प्रभागात तिकीट हवे, असा आग्रह धरू नका. मेरीटटनुसार तिकीट दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाची कामे लोकांपर्यंत पोहचवा. नागरिकांशी संवाद वाढवा, जनरेशन गॅप पडू देऊ नका. शहरात मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी आहेत. पद घेतल्यानंतर त्या बैठका व आंदोलनास येत नाहीत. हे चालणार नाही. महिलांसह विद्यार्थी व युवकांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अॅक्टीव्ह व्हावे. पक्षाने दिलेल्या तसेच, स्थानिक मुद्दे घेऊन आक्रमकपणे आंदोलन करा, असा सज्जड दम देत वागणे खपवून घेणार नसल्याचे अन्यथा मला वेगळा विचार करावा लागेल, असा सूचक इशारा त्यांनी दिला.
माजी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी नगरसेवक मयूर कलाटे, डब्बू आसवाणी दिसत नाहीत, असे अजित पवार यांनी विचारले. दुपारी होते, लग्नाला गेलेत असे उत्तर त्यांना पदाधिकाऱ्यांनी दिले. खरेच लग्नाला गेले की. दुसरे लग्न करायले गेले आहेत, हे शोधावे लागेल, असे अजित पवार म्हणताच सभागृहात हशा पिकला. “आओ जाओ घर तुम्हारा, असे त्यांनी स्पष्ट केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भामा आसखेड पाणी योजनेसाठी जॅकवेल व पंपिंग स्टेशनचे १२१ कोटींचे काम १५१ कोटीवर नेऊन उथळपट्टी केली जात आहे. सत्ताधारीच एकमेकांवर आरोप करीत आहेत. अनागोंदी कारभार सुरू आहे. त्यावर कोणाचे कंट्रोल नाही. नागरिकांच्या पैशांचा गैरवापर सुरू आहे. मेट्रोच्या कामाला गती नाही. राज्यात सत्ता येऊन सहा महिने झाले तरी, शहरातील विकासकरामांच्या उद्घाटनाला भाजप नेत्यांना वेळ मिळत नाही, अशी टीका अजित पवार यांनी केली. गहाळ बसू नका, भ्रष्टाचाराचे अनेक मुद्दे आहेत. ते बाहेर काढा. त्या विरोधात आंदोलन करा, असा सल्ला त्यांनी कार्यकत्यांना दिला.
८२ हजार बाटल्या रक्त संकलनाचा निर्धार
राज्यात रक्ताची कमतरता असल्याने शरद पवार यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात सात दिवस रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. त्यात तब्बल ८२ हजार वाटल्या जमा करण्याचा निर्धार आहे. सर्वांनी रक्तदान करावे. त्यामुळे शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. ते रक्त लगेच तयार होते. दर तीन महिन्यांनी रक्तदा करावे, असे आवाहन त्यांनी केले.