न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२२) :- मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कोणला द्यायचा? याबाबत आता उद्या सोमवारी (दि. ३०) सुनावणी आहे. या सुनावणीमध्ये अंतिम निर्णय येण्याची शक्यता दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वत: शिवाजी पार्कवरील एका जाहीर सभेत सांगितलं होतं, की आता माझ्यानंतर या शिवसेनेची जबाबदारी उद्धव ठाकरे हे पूर्ण सांभाळतील. तुम्ही त्यांना साथ द्या, सगळ्यांनी त्यांच्या पाठीशी उभा रहा आणि युवा म्हणून ती जबाबदारी आदित्य ठाकरे घेतील, असं बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलं आहे. त्यामळे त्याची नोंद शिवसैनिकांनी घ्यावी.” असं अजित पवार म्हणाले आहेत.
दोन्ही गटांना लेखी उत्तर दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. दोन्ही गटांनी लेखी उत्तर दाखल केल्यानंतर पुढील सुनावणी होणार असल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला असून ४० आमदार, १२ खासदार आणि अनेक पदाधिकारी व लाखो कार्यकर्ते आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीतील बहुसंख्य पदाधिकारी, काही आमदार व खासदार आपल्याबरोबर असल्याचा दावा केला आहे.