- देहू संस्थांनाकडून प्रशासनाला तंबी; बीज सोहळ्यानिम्मित खबरदारीच्या सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ६ मार्च २०२३) :- जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज सोहळा गुरुवारी (दि. ९) होत आहे. या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी केली आहे. भाविकांसाठी आरोग्य, निवारा आणि पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची सोय संस्थानने केली आहे. संत तुकाराम महाराज देऊळवाड्याला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळ्याला ३७५ वर्ष होत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. या भाविकांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थानने जय्यत तयारी केली आहे. याबाबतची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली. यावेळी विश्वस्त माणिक महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, संतोष महाराज मोरे, अजित मोरे आदी उपस्थित होते.
संस्थानचे विश्वस्त संजय महाराज मोरे म्हणाले, ‘‘यंदा इंद्रायणी नदीत पुरेसा पाणीसाठा आहे. मात्र, त्यात गावातील सांडपाणी मिसळत आहे. देहू नगरपंचायत प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून गावातील सांडपाणी इंद्रायणी नदीत सोडू नका, अशी मागणी केली आहे. वैकुंठस्थान स्थानाजवळ दररोज सांडपाणी नदीत सोडले जात आहे. या ठिकाणी भाविक अंघोळ करून तीर्थ म्हणून तेच पाणी पितात. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास त्यास प्रशासन जबाबदार असेल.’’
भाविकांच्या सुरक्षेसाठी देऊळवाड्यात एकूण ३२ सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. वैकुंठगमन सोहळ्याचा ठिकाणीही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. दोन दिवसांत दिंड्या देहूत दाखल होतील. त्यामुळे दर्शनबारीची नव्याने दुरुस्ती करण्यात आली असून, पत्र्याच्या शेडची उभारणी केली आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईचे काम सुरु आहे. शुद्ध पाण्यासाठी फिल्टर बसविण्यात आले आहे. स्वच्छतेसाठी सोळा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. देऊळवाड्यात औषधोपचाराची सुविधादेखील करण्यात येणार आहे. स्वच्छता आणि साफसफाईसाठी प्रबोधन करण्यात येणार आहे. इंद्रायणी नदीचा घाट स्वच्छ करण्यात येत असून नव्याने बांधण्यात आलेल्या भक्तनिवासात वारकऱ्यांची सोय करण्यात आलेली आहे. पित्ती धर्मशाळेतही भाविकांना राहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. संस्थानच्या वतीने यात्रा काळात महाप्रसादाचे आयोजन केले आहे. भाविकांना गाथा उपलब्ध व्हावी यासाठी संस्थानने नवीन छपाई केलेली आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांनी दिली आहे.


















