- पाण्याचा वापर जपून करा; पाटबंधारे विभागाचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२३) :- पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या मावळातील पवना धरणात आजमितीला ४८.९३ टक्के इतका पाणीसाठा आहे. जुलै अखेर पर्यंत पुरेल एवढा हा साठा असून गतवर्षीच्या आजच्या तारखेला ४९.०३ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का कमी पाणीसाठा आहे. पाणीसाठा पुरेसा असला तरी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या पवना धरणामध्ये यंदा मार्चअखेरपर्यंत दिलासादायक पाणीसाठा आहे. यावर्षी पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने तब्बल तीनवेळा धरण शंभर टक्के भरले होते. पाणलोट क्षेत्रात यंदा दोन हजार ७७७ मिली मीटर पावसाची नोंद झाली. तर, गतवर्षी दोन हजार ७२२ मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्यावर्षीपेक्षा ५५ मिमी पावसाची अधिक नोंद झाली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत पवना धरण तुडुंब भरले होते.
मार्चमध्ये देखील धरणात ४८.९३ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. त्यामुळे शहरवासीयांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाही. धरणातील पाणीसाठा पुरेसा असला. तरी, आता उन्हाळा वाढू लागला आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढेल. कडक उन्हाच्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
पवना धरणात आजमितीला ४८.९३ टक्के इतका पाणीसाठा आहे. जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. पुरेसा पाणीसाठा असला तरी नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. जेणेकरुन पुढील काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये.
समीर मोरे, शाखा अभियंता – पवना धरण…