न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मार्च २०२३) :- मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल दरात १८ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. शनिवार, १ एप्रिलपासून टोलचे नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांच्या खिशाला ५० ते ३३० रुपयांची अधिकची झळ सोसावी लागणार आहे.
मुंबई- पुणे महामार्गावर २००४ साली टोल आकारणी सुरू करताना दर तीन वर्षांनी टोलच्या दरात १८ टक्के दरवाढ करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार, एप्रिल २०२३ मधील टोलच्या दरात वाढ होत आहे. १ एप्रिल २०२३ रोजी लागू होणारे टोलचे दर हे २०३० पर्यंत कायम असतील, असे ‘एमएसआरडीसी’कडून सांगण्यात आले आहे.
कोणत्याही नव्या सुविधा नसताना तसेच वाहतूक व्यवस्थापनाची यंत्रणा नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात टोल दरवाढीवरून नाराजीही व्यक्त होत आहे.
१८ टक्के वाढीच्या २००४ च्या अधिसूचनेमागे चुकीची गृहितके असल्याचे सांगण्यात येत आहे. २००४ ते २०१९ या कालावधीत रस्त्यावरील वाहतूक दरवर्षी ५ टक्के दराने वाढणार असल्याचा अंदाज बांधण्यात आला होता. त्यानुसार कंत्राटदाराला मिळणारे निधीचे गृहितक मांडण्यात आले होते. प्रत्यक्षात कैकपटीने वाहनांची संख्या वाढल्याने कंत्राटदाराला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळाले होते. याशिवाय, २०२० मध्ये नवीन कंत्राट ठरविताना या सर्व बाबींचा विचार करण्यात आला नाही. मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापनाचा पूर्णपणे बोजवारा उडाला आहे. त्यामुळे एकीकडे अपघात आणि दुसरीकडे सततच्या वाहतूक कोंडीचा सामना वाहनचालकांना करावा लागतो. त्यात आता या टोल दरवाढीची भर पडली आहे.