- त्यामुळे पवारांपुढे उरले होते केवळ दोनच मार्ग…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ मे २०२३) :- शरद पवार यांनी आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचं म्हटलं. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. अशात अंजली दमानिया यांनी एक वेगळाच आरोप शरद पवारांवर केला आहे.
“शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देणं हे मला अपेक्षित होतं. १९ एप्रिलला मी माझ्या काही जवळच्या पत्रकार मित्रांना सांगितलं होतं की आत्ता जे चाललं आहे ते माझ्या राजकीय विश्लेषणाप्रमाणेच आहे. ते हेच आहे की भाजपाला राष्ट्रवादी काँग्रेसोबत युती करायची आहे. पण त्या युतीत त्यांना शरद पवार नकोत त्यांना फक्त अजित पवारच आहेत. अजित पवार जर पक्ष फोडून गेले असते तर ते शरद पवारांना मान्य झालं नसतं.
पक्ष फुटताना पाहणं किंवा राजीनामा देणं आणि अजित पवारांना अध्यक्ष करणं असे दोनच मार्ग शरद पवारांपुढे उरले होते. आत्ताच्या घडीला जे काही दबावतंत्र चाललं आहे ते भाजपाचं आहे. भाजपाला महाराष्ट्रावर पकड तयार करायची आहे त्यासाठी ते वाट्टेल ते करतील. आज जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आपण अजित पवार यांची बॉडी लँग्वेज पाहिली तर ते सारखे कार्यकर्त्यांवर चिडत होते. त्यावरूनच सगळं लक्षात आलं.” असंही दमानिया यांनी म्हटलं आहे.