- पाणी कोठे भरले जाते? ते कसे भरले जाते, त्याची गुणवत्ता काय?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२३) :- कोणत्याही सार्वजनिक वा घरगुती कार्यक्रमात स्वस्त आणि गारेगार पाण्याच्या जारची जोरदार विक्री होत आहे. मात्र, हे पाणी शुद्ध की अशुद्ध हे तपासण्यासाठी सध्या सरकारकडे कोणतीच यंत्रणा नाही. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनाने गंभीर दखल घेऊन जारमधील पाण्याची तपासणी करणे गरजेचे आहे.
मंगल कार्यालयांपासून ते कॉर्पोरेट ऑफिसपर्यंत ‘कूल जार’ मधून पाणी पुरवठा होतो. ग्रामीण भागातील लाखो लोक रोज या जारमधील पाणी पितात. या कार्यक्रमात पाण्याचा जार गरजेचा झाला आहे. प्लास्टिकच्या पारदर्शक जारमधील पाणी म्हणजे शुद्ध पाणी, असे मानले जाते. पिंपरी चिंचवड शहरांच्या विविध भागात अशा अनेक कंपन्यांनी आपले दुकान थाटले असून अवघ्या २० ते ३० रूपयांत २० लिटर पाण्याच्या जारसाठी घरपोच सेवा दिली जात
आहे. पण यातील पाणी कोठे भरले जाते ते कसे भरले जाते. त्याची गुणवत्ता काय? हे पाणी शुद्ध की अशुद्ध ठरवण्याची कोणतीच यंत्रणा सध्या नाही.
जारमधील थंड पाण्याच्या तपासणीचा हा विषय अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कक्षेत येत असल्याचे स्पष्ट झाले. सध्यातरी याबाबत कोणताच कायदा अस्तित्वात नसून याबाबत कायद्याचा मसुदा तयार करण्याबाबत विधी व न्याय विभाग यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापुढील काळात जारमधून पाणी पुरविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार असल्याचे शासनाने जरी स्पष्ट केले असले तरी कंपन्या याला किती दाद देतात हे पाहणे गरजेचे आहे.
पिंपरी चिंचवड शहरात अशा अनेक सोय आहेत की त्यांना बोअरवेल किंवा टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो. अशा सोसायटीमधील नागरिकही जारमधील पाणी पितात. यामुळे पिंपरी चिंचवड शहरात जारमधील पाण्याची करोडो रुपयांची उलाढाल आहे.
पाणी तपासल्यानंतर ते आरोग्यासाठी हानिकारक आढळल्यास तीन वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दोन लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद कायद्याच्या मसुद्यात करण्यात येणार आहे, अशी माहिती शासनाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.