- केंद्राच्या ‘अमृत भारत स्थानक’ योजनेची अंमलबजावणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ मे २०२३) :- रेल्वे मंत्रालयाने स्थानकांचा कायापालट करण्यासाठी अमृत भारत स्थानक योजना राबवण्यास सुरूवात केली आहे. या अंतर्गत प्रत्येक रेल्वे विभागातील १५ स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. त्यात पुणे विभागातील चिंचवड, आकुर्डीसह इतर स्थानकांचा समावेश आहे.
केंद्र सरकारने अमृत भारत स्थानक योजना राबवण्यास सुरूवात केली आहे. या योजनेंतर्गत देशभरात १ हजार २७५ स्थानकांचा विकास केला जाणार आहे. त्यात पुणे विभागातील हडपसर, चिंचवड, आकुर्डी, देहू रोड, तळेगाव, केडगाव, उरूळी, बारामती, लोणंद, वाठार, कराड, सांगली, हाकणंगले, सातारा आणि कोल्हापूर या १५ स्थानकांचा समावेश आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत या स्थानकांचा कायापालट केला जाणार आहे. यामुळे या स्थानकांचा चेहरामोहरा वर्षभरात बदलला जाणार आहे.
प्रत्येक स्थानकाचा विकास करताना तेथील रोजची सरासरी प्रवासी संख्या लक्षात घेऊन नियोजन करण्यात येणार आहे. त्याबरोबरच स्थानकाची सध्याची रचनाही विचारात घेतली जाणार आहे. दूरदृष्टीने स्थानकांचा विकास करण्यावर भर दिला जाईल. प्रामुख्याने प्रवासीकेंद्रित सुविधा स्थानकांवर विकसित केल्या जातील. स्थानकाच्या बाह्य रुपासोबत अंतर्गत भागातही सुधारणा केल्या जाणार आहेत.
पुणे विभागात अमृत योजनेंतर्गत १५ स्थानकांचा विकास केला जाणार आहे. प्रमुख उपनगरी आणि प्रवासी क्षमता जास्त असलेल्या स्थानकांची निवड यासाठी करण्यात आली आहे. स्थानकाचे धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने असलेले स्थानही पाहूनही त्यांची निवड झाली आहे, असे रेल्वेच्या पुणे विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी सांगितले.
स्थानक परिसरातील वाहतूक सुधारणा आणि सुशोभीकरण, स्थानक प्रवेशद्वारांचा विकास, फलाटांची उंची वाढवणे आणि त्यावर आच्छादन, स्थानकातील अंतर्गत रचनेत सुधारणा, स्वच्छतागृहांमध्ये सुधारणा, चांगल्या दर्जाचे फर्निचर, आवश्यक असेल तिथे १२ मीटर रुंदीचा पादचारी उड्डाणपूल अशा गोष्टींचा समावेश आहे.