- चिंचवड प्रवासी संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 19 जून 2023) :- एसटी सेवा आवश्यकच परंतु, प्रसंग ओढवणार्या प्रवाश्यांना तात्काळ मदत पुरविण्याबाबत योग्य ते आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्गमित करावेत, अशी मागणी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार व पदाधिकार्यांनी ई-मेलद्वारे केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, शालेय सुट्ट्या संपल्यामुळे शाळेत जाणारे विद्यार्थी, महाविद्यालयाचे निकाल लागल्यामुळे प्रवेशाची लगबग राज्य भरात विद्यार्थी, पालक एसटी सेवेने ये-जा करतात. त्यातच जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी पंढरपूरच्या दिशेने जात असताना, अशातच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने भाविकांसाठी जादा एसटी बसेस सोडण्याच्या निर्णयामुळे मुंबई, पिंपरी चिंचवड, दादर, बोरिवली, ठाणे, अलिबाग, परेल, पुणे या प्रमुख बस स्थानकातून सातारा, कोल्हापूर, सांगली, आष्टा आदी महत्वाच्या शहरात तसेच तालुक्याच्या ठिकाणी वरील सर्व मार्गावरून लालपरी, एशियाड आदी बस संख्या कमी प्रमाणात धावत असल्यामुळे सर्व बसेसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. परंतु, एखादी बस रस्त्यात बंद पडल्यास, तिच्या टायर फुटणे, ब्रेक डाऊन झाल्यास नजिकच्या एसटी डेपोतून तातडीने मदत मिळत नाही. प्रवाशीयांना तासंतास ताटकळत रस्त्यावरच उभे राहावे लागते, त्यात लहान मुले, गरोदर स्त्रीया, महिला, वयोवृद्धांचा समावेश असतो.
असाच प्रसंग (दि.19) रोजी बस क्रमांक एमएच 14 बीटी 4901 या लालपरी या बसवर आला. सदर बस परेल येथून मेगा हायवे मार्गे सातारा, कोरेगाव येथे जात असताना वाकड परिसरातील भुमकर चौक एसटी बस थांब्यावर सायंकाळी 6.20 वा. बसमध्ये प्रवासीयांची चढउतार झाली. बस पूर्णपणे भरलेली होती. पुढे 7.15 मि. सुमारास वारजे पुलालगत नेरे गावाच्या परिसरात बसचा पुढील टायर निकामी झाला. बस चालकाला व वाहकाला प्रवासीयांनी आमचा पुढील प्रवास कसा करायचा याबाबत विचारणा केली असता, त्याने स्वारगेट बस स्थानकाला संपर्क करून प्रवासीयांना सांगितले तेथे सध्या गाडीचे टायर बदलणारे कर्मचारी उपलब्ध नाही, आल्यानंतर तुमच्या येथे पाठविण्यात येईल, प्रवाशीयांनी सांगितले आम्ही वर्गणी काढून पैसे देतो, जवळच पम्चर काढणारे दुकान पुढे आहे त्यावर चालक वाहकाने नकार दिला. आम्ही जरी खर्च केला तरी, एसटी डेपोमधील अधिकारी मान्य करतील का? असा सवाल चालकाने केला. यावर प्रवाशी हताश या एसटी बसमध्ये पाचवड, शिरवळ, सातारा तसेच कोल्हापूर गोवा मार्गावर जाणारे प्रवासी होते. दोन टेकड्याच्या मध्येच एसटी बंद झाल्यामुळे प्रवासीयांना रात्री 8.00 सुमारास एकही बस मुंबईकडून सातारा मार्गाकडे जाताना आढळून आली नाही. प्रवासीयांनी खाजगी वाहनांना हात करून थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र; एकही वाहन न थांबल्यामुळे प्रवाशीयांच्या अडचणीत भरच पडत होती. पाचवड येथे जाणारे एकाच कुटूंबातील दोघांना रिक्षा चालकाने दोन हजार पाचशे भाडे सांगितल्याने त्यांनी नकार दिला. खाजगी वाहन चालकाने सातारा येथे जाण्यासाठी प्रत्येकी तीनशे दर आकारू असे सांगितले. सदर खर्च प्रवाशीयांना परवडणारे नसल्यामुळे त्यांनी नकार दिला. चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार मी, देखील याच बसने प्रवास करत असल्यामुळे मला तात्काळ जाणे अत्यंत गरजेचे होते. रात्रीची वेळ असताना देखील अनोळखी वाहनात प्रवास करणे जोखमीचे असताना देखील मी, पुढील प्रवास करणे पसंत केले. परंतु, मागील पूर्ण भरलेल्या प्रवासीयांची सुटका कशी होणार, त्यांना मदत केव्हा मिळेल ते त्यांच्या नियोजित ठिकाणी कसे पोहतील या विवंचणेतच सातारा येथे रात्रीचे 10.15 पोहचलो.
चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने मागणी करण्यात येत आहे की, रस्त्यात बस ब्रेक डाऊन झाल्यास प्रवाशांना पैेसे परत करण्याचा निर्णय घेण्यात यावा. नजिकच्या डेपोतून तात्काळ घटनास्थळी बस पाठविण्याचा आदेश राज्यातील सर्व एसटी बस स्थानकांना देण्यात यावा, तसेच, प्रवासीयांचे खानपानची व्यवस्था एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात यावी, कारण सामान्य प्रवासीयांची एसटी सेवेवरच विश्वास असून त्यांची सुरक्षितता एसटी महामंडळाने घेणे गरजेचेच आहे. प्रत्येक एसटीमध्ये अत्याधुनिक जॅक, सुस्थितीतील हवा भरलेले टायर असल्याशिवाय बस डेपोतून सोडताच कामा नये, असा आदेश पारित करावा. कारण पावसाळ्यात अशा घटना घडल्यास प्रवाशीयांचे आतोनात हाल होतील. वाहक व चालकाने देखील काही खर्च केल्यास त्यांची पुर्ण रक्कम त्यांस अदा करण्यात यावी, असे आदेशही एसटी डेपो चालकांना देण्यात यावे, काल जी घटना घडली ती इतरांवर घडू नये, असे पत्रात म्हटले आहे.














