- रिंगरोड क्षेत्राची मोजणी व सीमांकनाचे काम शेतकऱ्यांनी थांबविले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जुलै २०२३) :- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रिंगरोडला इंदोरीतील बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला असून, रिंगरोड क्षेत्राची मोजणी व सीमांकनाचे काम शेतकऱ्यांनी थांबविले आहे.
रिंगरोडबाबत १९ मे २०२१ रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार रिंगरोडची पाहणी व मोजणी करून जागेवर चिरे लावून सीमांकन केले होते. परंतु त्यानंतर कोणालाही कसलीही पूर्वसूचना न देता एक नोव्हेंबर २०२२ रोजी नवीन राजपत्र प्रसिद्ध करून त्यानुसार पुढील कार्यवाही सुरू केली आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यातून वनक्षेत्र विभाग व शासकीय गायरान क्षेत्र वाचवून शेतकऱ्यांना देशोधडीस पाठवण्याचा हेतू दिसत आहे. म्हणून शेतकऱ्यांचा नवीन रिंगरोडला विरोध कायम राहील. बाधित २१ शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य विकास महामंडळास लेखी निवेदन उपअभियंता गोविंद गायकवाड व तळेगाव विभागाचे मंडलाधिकारी बी. के. मेकाले यांच्याकडे निवेदन सुपूर्त केले. निवेदनाचा सहानुभूतिपूर्वक विचार होऊन पूर्वी सीमांकन केलेला रिंगरोड करण्याचा निर्णय घ्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात दिला आहे.
भंडारा डोंगर तीर्थक्षेत्राचे व वारकऱ्यांचे नाव पुढे करून हा धनदांडग्यांनी रचलेला डाव आहे. कारण भंडारा डोंगर देवस्थान क्षेत्र हद्द व या अगोदर निश्चित केलेल्या रिंगरोडची हद्द यात सुमारे दोन किलोमीटरचे अंतर होते. भंडारा डोंगराच्या पायथ्याजवळून व डोंगरास कोणताही अडथळा होत नव्हता. अथवा वारकरी भाविक भक्तांच्या भावनेस बाधा होण्याचेही काही कारण नव्हते. नाही तरी डोंगरावर मंदिरापर्यंत गेलेला रस्ता डोंगर क्षेत्र फोडूनच नेला आहे. त्यावेळी वारकऱ्यांच्या भावनांचा विचार नाही झाला. आता केवळ गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करून श्रीमंतांना वाचवायचे आहे. हे या बदलातून स्पष्ट दिसत आहे, अशी प्रतिक्रिया हरिदास ढोरे यांनी व्यक्त केली.
केवळ धनदांडग्यांचे भूक्षेत्र व स्थावर मालमत्ता वाचविण्यासाठी हा नवीन खटाटोप करण्यात आला आहे. वनक्षेत्र वाचवून तळेगाव चाकण रस्ता ओलांडून पलिकडे दक्षिण बाजूस रिंगरोड नेऊन पुन्हा पुढे काही अंतरावर तळेगाव चाकण रस्ता ओलांडून रिंगरोड पुन्हा उत्तर बाजूस वळविला आहे. यातून स्पष्ट दिसून येते की गरीब शेतकऱ्यांवर अन्याय करून श्रीमंतांच्या जमिनी वाचविल्या आहेत, असे नंदकुमार ढोरे, मनोहर काशीद व सुदाम भसे यांनी सांगितले.
बाधित शेतकऱ्यांनी विनंती केली आहे की याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्ही चर्चा करतो. त्यानुसार काम करा. म्हणून तात्पुरत्या स्वरूपात काम थांबविले आहे.
– गोविंद गायकवाड, उपअभियंता, महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ..