- म्हणाले, ‘इथे पोहोचायला तुम्ही उशीर केला’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑगस्ट २०२३) :- केंद्रीय सहकार संस्थेने तयार केलेल्या संकेतस्थळाचं उद्घाटन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह आज चिंचवडमधील रामकृष्ण मोरे सभागृहात आले होते. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित होते.
दरम्यान भाषणाच्या सुरुवातीलाच अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा उल्लेख केला. “अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आम्ही एकत्र एकाच व्यासपीठावर आलो आहोत. अजितदादा तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे पोहोचायला तुम्ही उशीर केला”, असे विधान अमित शाह यांनी केले. यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. तर अजित पवार यांनी आपल्या जागेवरून हात जोडून अमित शाह यांना अभिवादन केले.
तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे बरेच कौतुक केले. तसेच मी वेगळा निर्णय घेण्यामागे काय कारणे आहेत, असा अनेकांना प्रश्न पडतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोघेच देशाचे नेतृत्व करू शकतात. त्यामुळेच मी मोठा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. “अमित शाह हे गुजरातमधून येतात. पण, त्यांचे महाराष्ट्रावर जास्त प्रेम आहे. कारण, ते महाराष्ट्राचे जावई आहेत. प्रत्येक जावयाचे सासरवाडीवर जास्त प्रेम असते. महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्य एकच होते. सहकार क्षेत्रात महाराष्ट्र आणि गुजरातचा इतिहास आणि वर्तमानकाळ गौरवशाली राहिला आहे,” असेही अजित पवार यांनी पुढे म्हणाले.
दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील अमित शाह यांचे महाराष्ट्रावर अधिक प्रेम असल्याचे सांगितले. महाराष्ट्रात सहकाराची मुहूर्तमेठ रोवली गेली. राज्याच्या गावागावात सहकार चळवळ पोहोचलेली असून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात त्याचा मोठा वाटा आहे. अमित शाह यांनी केंद्रीय सहकार मंत्रालयाची सूत्र हातात घेतल्यापासून देशपातळीवर सहकार चळवळीची घोडदौड सुरू आहे. नवीन कायदा मंजूर करण्यात आला. आज मंत्रालयाचे नवीन पोर्टल सुरू होत असताना त्याचे अनावरण करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचीच निवड केली.
अमित शाह हे महाराष्ट्राचे जावई आहेत, असे म्हटले जाते. ते खरे असले तरी महाराष्ट्र ही त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. अमित शाह यांचा जन्म मुंबईत झाला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच त्यांनी आपला पहिला कारखाना महाराष्ट्रातच उघडला होता, अशी आठवणही त्यांनी सांगितली.