- राष्ट्रवादीचा गड ढासळण्याच्या स्थितीत; नेते, कार्यकर्ते कॉंग्रेसच्या वाटेवर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. १० ऑगस्ट २०२३) :- मावळ तालुक्यात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्यता असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री यांच्यासह अनेकजण राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली.
मावळ तालुक्याची ओळख गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेसचा बालेकिल्ला अशीही होती. परंतु गटबाजीमुळे तीस वर्षांत दोन्ही काँग्रेसचा आमदार झाला नाही. मावळात राष्ट्रवादीचा आमदार व्हावा यासाठी शरद पवार व अजित पवार यांनी प्रयत्न केले, पण ते झाले नाहीत. त्यामुळे गेल्या तीस वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला झाला. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने सुनील शेळके यांना उमेदवारी न दिल्याने त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यावेळी ते विजयी झाले. तेव्हापासून तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व वाढले आहे.
याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याने माहिती देताना सांगितले की, आम्ही शरद पवार यांना मानणारे आहोत. आतापर्यंत भाजपबरोबर वैर घेऊन निवडणुका लढलो. कार्यकर्ते तयार केले. पक्ष वाढवला. असे असताना अजित पवार यांनी भाजपबरोबर हातमिळवणी केली, हे आम्हाला पसंत नाही. त्यामुळे मी व हजारो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहोत. याबाबत बैठक झाली आहे.
अजित पवार यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करुन उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. त्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ४० आमदारांनी अजित पवार यांना पाठिबा दिला. या घडामोडीनंतर शरद पवार यांना मानणारा तालुक्यात मोठा गट आहे. पण तूर्त तरी हा गट शांत दिसत होता. परंतु आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. याबाबत बैठकाही सुरु झाल्या असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्याबरोबर फोनद्वारे संपर्क झाला आहे. १५ ऑगस्टनंतर काँग्रेसचा मेळावा घेऊन प्रवेश केला जाणार आहे.
तालुक्यात काँग्रेसचे मतदार आहेत. परंतु, नेतृत्व खंबीर नव्हते. त्यामुळे गेल्या काही वर्षांत काँग्रेसमध्ये सामसूम दिसत होती. तालुक्यातील ज्येष्ठ उद्योजक रामदास काकडे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर पक्षातील मरगळ दूर झाली आहे. तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या.